Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीभाजप सरकारची विरोधी पक्षांसमोर दहशत: आ.पृथ्वीराज चव्हाण

भाजप सरकारची विरोधी पक्षांसमोर दहशत: आ.पृथ्वीराज चव्हाण

कराड: मुख्यमंत्री याआधी माझ्याजवळ सर्वांच्या कुंडल्या आहेत असे म्हणायचे. पण करत तर काहीच नव्हते. पण जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या. तसतसे विरोधी पक्षांसमोर भाजपचे सरकार दहशत निर्माण करत आहे. त्यामुळे दबाव तंत्रासाठी कुंडल्या आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. असे सांगून मी मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांची वैयक्तिक कामे न करता विकासकामांसाठी निधी देताना राजकारण केले नाही. त्यामुळे मलाही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात विकासकामे राबवताना सरकारने झुकते माप दिले. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
शेरे (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंतराव निकम अध्यक्षस्थानी होते.
सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शिवराज मोरे, राहुल पाटील, नरेंद्र नांगरे-पाटील, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, कृष्णेचे माजी संचालक माणिकराव जाधव, अशोकराव पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य बाबुराव पाटील, भगवानराव निकम, माजी सरपंच मोहनराव निकम, अर्जुन जगदाळे, डॉ. सचिन कोळेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गेल्या तीन महिन्यात दहा कोटींची कामे मंजूर झाली. अजूनही तितकीच कामे प्रस्तावित आहेत. मी मुख्यमंत्री असताना हजारमाचीला जागतिक पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र उभा करता आले, हे मला खूप समाधानकारक काम करता आले. मला संधी मिळाली म्हणून ही कामे करता आली. 1991 ला तुमच्यामुळे माझी राजकीय कार्यकिर्द सुरु झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर मला तुमच्यासाठी खूप कामे करता आली. गेल्या पाच वर्षातही मला तुमच्यासाठी पूर्ण वेळ देता आला.
ते म्हणाले, राजकारणात जेष्ठता मिळायची असेल, तर एका दिवसात ते शक्य नाही. यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना राजकारणात संधी दिली. गेल्या 50 ते 55 वर्षात ते एकही निवडणूक हरलेले नाहीत. त्यांच्यासारखे नेतृत्व पंतप्रधान पदावर हक्क सांगण्याइतपत मोठे आहे. मला राजीव गांधींनी संधी दिली. सुरुवातीला तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर होता. मी राजकारणात पुढे गेलो. काही काळ बिकटही होता, परंतु मी डगमगलो नाही.
पुन्हा ताकदीने उभा राहिलो. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर संक्रमण स्थितीत सोनिया गांधींनी मला मुख्यमंत्री केले. दिल्लीतील कामाच्या अनुभवावर मराठा आरक्षण, राजीव गांधी आरोग्य जीवनदायिनी योजना, 108 रुग्णवाहिका यासह अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. भाजप सरकारने आरोग्य योजनेचे नाव बदलले, पण नांवे बदलून व्यक्तिमत्व झाकत नाही. नावे बदलण्याव्यतिरिक्त एकही योजना पुढे नेलेली नाही.
ते म्हणाले, सध्या देशातील अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे. मोटार उत्पादन करणार्‍या कंपन्या आठवड्यातून चार दिवस बंद राहत आहेत. देशातील 267 मोटार विकणारी शोरूम बंद झाल्या आहेत. या क्षेत्रातील साडेतीन लाख जणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. तोच परिणाम मोटार वाहन संबंधित साहित्य निर्मिती क्षेत्रातही आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून 1 लाख 76 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. अशा बिकट परिस्थितीत देशातील अर्थव्यवस्था आहे.
अजितराव पाटील म्हणाले, यशवंतराव मोहिते, यशवंतराव चव्हाण व जयवंतराव भोसले यांनी या विभागाचा कायापालट केला. चंद्रकांतदादांच्या मागे फिरणार्‍यांनी विकासासाठी पैसे किती आणले ते सांगा. त्यांना कृष्णा कारखाना चांगला चालवायचा नाही. तर त्यांना जयवंत शुगर हे कांगारू सांभाळायचे आहे. राहुल पाटील यांचेही भाषण झाले. बाबुराव पाटील, अशोकराव पाटील, मोहनराव निकम, शिवाजीराव पाटील, किरण निकम, आनंदराव पवार, जावेद शिकलगार, मनोज पवार, नंदकुमार निकम, दीपक पाटील यांनी स्वागत केले. मारुती निकम यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. दीपक पाटील यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular