कोरेगाव: कोरेगावचा आमदार आमचा होईल, नाही झाला तर आम्ही ठरवू तोच होईल. काँग्रेसला केवळ गृहीत धरुन आता चालणार नाही, काँग्रेसला विश्वासात न घेतल्यास कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा माढा केल्याशिवाय राहणार नाही, अशी तंबी काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे न घेता स्पष्ट शब्दात दिली. दरम्यान, हेच सांगण्यासाठीच मी कोरेगावात आलो आहे. माझी मनापासून इच्छा आहे की, कोरेगाचा आमदार किरण बर्गेच हवा, लोकांची तीच भावना आहे, असेही त्यांनी नमूद केले.
निमित्त होते, कोरेगावच्या प्रथम महिला नगराध्यक्षा म्हणून सौ. रेश्मा संतोष कोकरे यांची निवड झाल्याबद्दलच्या जाहीर सत्कार समारंभाचे. कोरेगाव विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने औद्योगिक वसाहतीतील प्रियांका मल्टीपर्पज हॉलमध्ये आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते सौ. रेश्मा कोकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषद सदस्य भीमरावकाका पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जरंडेश्वर साखर कारखाना कामगार संघाचे अध्यक्ष किरण बर्गे, पुसेगाव येथील प. पू. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रहिमतपूर नगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मानाजीराव घाडगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन वीर, पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब निकम, सौ. शुभांगी काकडे, नगरसेविका सौ. अर्चना किरण बर्गे, सौ. पूनम मेरुकर, नितीन उर्ङ्ग बच्चूशेठ ओसवाल, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजित भोसले, इङ्गकोच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मनोहर बर्गे, संतोष कोकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे यांनी जोरदार बॅटिंग करत राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस भाषेत समाचार घेतला. राष्ट्रवादीचे संस्थापक-अध्यक्ष खा. शरद पवार व विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांना माझा विरोध केवळ राजकारणासाठी नाही, तर सातारा जिल्ह्याने सर्वाधिक प्रेम करुनही पाणी दिले नाही, म्हणून खासदार शरद पवार यांना तर 20 वर्षे मंत्री असूनही जिल्ह्याला पाणी देऊ शकले नाही म्हणून रामराजे नाईक-निंबाळकर यांना विरोध आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार्या जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना रखडविण्याचे पाप जलसंपदा खात्याचे माजी मंत्री म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांनीच केले आहे, असा आरोप त्यांनी केला. या योजनेविषयी आ. शशिकांत शिंदे हे चुकीची माहिती देऊन सर्वसामान्य जनतेची अक्षरश: दिशाभूल करत आहेत. योजनेचा हा विषय मंत्रिमंडळापुढे आलाच नाही. त्यामुळे त्यांनी आता या विषयावर जबाबदारीने बोलले पाहिजे, असेही आ. गोरे यांनी नमूद केले.
आ. गोरे पुढे म्हणाले, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार आमचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा होईल, नाही झाला तर आम्ही ठरवू तोच होईल, हे मी नमूद करु इच्छितो. काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेतल्यास कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही, हे पुन्हा एकदा निक्षुण सांगतो. माझी मनापासून इच्छा आहे की, कोरेगावचा आमदार हा किरण बर्गेच हवा, लोकांची तीच भावना आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद आहे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये जाऊन खासदार होतो, हे त्याचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. सातारा जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ताकदीची माणसे आहेत, सर्वांनी ताकदीने पुढे येण्याची आवश्यकता आहे. आघाडी धर्म मला माहिती नाही, मात्र क्षमता असेल तर आमदार व संघटनेचा नेता झालाच पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. माण आणि खटाव वगळून जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांची अदलाबदल करा, अशी मागणी आ. गोरे यांनी केली.
आ. जयकुमार गोरे यांनी शंकरराव जगताप यांचा स्पष्टपणे उल्लेख केला. आण्णांनी मला राजकीय वाटचालीबाबत मार्गदर्शकपर सल्ला दिला होता. ते म्हणाले, जयकुमार तु ज्या वेगाने चालला आहेस, त्याच वेगाने तुला जिल्ह्यात विरोध होईल. आधी घरातून आणि नंतर बाहेरुन होईल.आण्णा बोललेले प्रत्येक वाक्य खरे ठरले असून, त्याचे प्रत्यंतर मला सातत्याने समाजकारणामध्ये काम करताना दिसून येत आहे.
यावेळी भीमराव पाटील, डॉ. सुरेश जाधव, नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, अर्चना बर्गे, निलेश माने, सम्राट बर्गे, माऊली गोडसे यांची भाषणे झाली. मनोहर बर्गे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अजित भोसले यांनी आभार मानले.
अन्यथा कोरेगावचा माढा केल्याशिवाय राहणार नाही : आ. गोरे
RELATED ARTICLES