मसूर : महापुराने वह्यापुस्तके भिजून खराब झाल्यामुळे दु:खीकष्टी झालेल्या वाळवा येथील शालेय विद्यार्थ्यांना गुंफण परिवार, ए.जी. ग्रुप (शिवडी, मुंबई) तसेच सांताक्रुझ येथील राजा रामदेव पोदार शाळा व शेठ आनंदीलाल पोदार विद्यालय यांनी मानवतेच्या भावनेतून पुढे येऊन शैक्षणिक साहित्याची मदत केली. ही मदत पाहून ही मुले अक्षरश: हरखून गेली व त्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले.
महापुरामुळे वाळवा (जि. सांगली) येथील शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यापुस्तकांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे या मुलांच्या चेहर्यावरचा आनंद हरवला असल्याची खंत वाळवा येथील जिजामाता विद्यालयातील सेवक राजेंद्र अडसुळे यांनी गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांच्याशी संपर्क साधून व्यक्त केली होती. तसेच या विद्यार्थ्यांसाठी अशा मदतीची गरज असल्याचे सांगितले होते. त्यानुसार डॉ. चेणगे यांनी मसूर व मुंबईत समाजकार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबिरे यांना याकामी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यातून सर्वांच्या समन्वयातून या शाळेतील विद्यार्थ्यांना तीन हजार वह्या तसेच पेन, पेन्सिल्स, खोडरबर अशी मौलिक मदत करण्यात आली.
कल्याण कांबिरे यांनी मारूती वेताळ, दादासाहेब मगर, सचिन जगदाळे, चंद्रकांत चव्हाण, गणेश चव्हाण आदी सहकार्यांसह वाळवा येथे जावून ही मदत जिजामाता विद्यालयात पोहोच केली. आपत्तीच्या प्रसंगी मिळालेली ही मदत पाहून विद्यार्थी हरखून गेले. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या संस्थेच्या शाळेला मदत करून त्यांनी देशासाठी केलेल्या अजोड त्यागासाठी या रूपाने कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे. यातून क्रांतीवीरांच्या भूमीशी निर्माण झालेले नाते अधिक घट्ट होईल, अशी भावना कल्याण कांबिरे यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या चेंडके, पर्यवेक्षक एस. एस. खणदाळे, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यर्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक साहित्याची मदत पाहून हरखली पूरग्रस्त मुले
RELATED ARTICLES