म्हसवड: गत चार ते पाच वर्षांपासून माण तालुक्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी झटत आहे. एकीकडे शासन शेतकर्यांचे उत्पन्न दीडपट वाढविण्याचा दावा करीत आहे. तर दुसरीकडे खताचे भाव गोणीमागे 100 ते 125 रुपयांनी वाढले आहेत. रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. अगोदरच दुष्काळामुळे पशुधनाचा चारा, पाण्याची व्यवस्था करताना शेतकरी हतबल झाले आहेत. आणि त्यात खतांमध्ये वाढ झाल्याने शेतकर्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. ही दरवाढ शेतकर्यांना दुष्काळात तेरावा महिना ठरणारी आहे.त्यामुळे पेरणी कशी करावी? असा प्रश्न शेतकर्यासमोर उभा ठाकला आहे. त्यातच या दरवाढीने शेतकर्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
शेतकर्यांच्या वेदना या वर्षीही कमी होताना दिसत नाहीत. आधीच दुष्काळ त्यात खतांची दरवाढ झाल्याने यावर्षी शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांना दरवर्षी नवनवीन संकटांचा सामना करावा लागत आहे. दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकर्यांना आपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. तर काही ठिकाणी पेरणी सुद्धा झाली नाही. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च करूनही शेतकर्यांच्या हाती कवडीही मिळाली नाही.
परिणामी गत वर्षी सारखेच या वर्षी खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकर्यांना बँकांच्या दारात पिक कर्जासाठी खेटे मारावे लागण्याची शक्यता आहे. त्यातच कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत 200 ते 250 रुपयांनी वाढ केली आहे. या काळात खताची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बहुतांश शेतकरी पावसाळ्यापूर्वीच खतांची खरेदी करत असतात मात्र या वेळी शेतकर्यांना खत खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
खतांच्या किमती वाढल्याने शेतकर्यांची आर्थिक गणित बिघडले आहे.पावसाच्या लहरीपणामुळे मागील चार-पाच वर्षांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे उत्पादनात सातत्याने घट होत असून शेतकर्यांचे आर्थिक गणित दरवर्षीच बिघडत आहे.दुसरीकडे महागाई गगनाला भिडत असताना शेती उपयोगी वस्तूंची दरवाढ दरवर्षी पहावयास मिळते. एकंदरीत दुष्काळ पाणीटंचाई पीक कर्जासाठी बँकांच्या रांगा वाढती महागाई आणि आता खतांचे भाव वाढल्याने शेतकर्यांच्या संकटात आणखीनच भर पडली आहे.यामध्ये शेतकरी पार पिचला आहे
माणमध्ये खताची भाववाढ; बळीराजासाठी दुष्काळात तेरावा
RELATED ARTICLES