म्हसवड : येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या सचिव सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने, के के अनुरूप, सुभद्रा पिसे, पालक प्रतिनिधी लुनेश विरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना सुलोचना बाबर म्हणाल्या मुले ही देशाचं भविष्य आहेत.मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे. या दृष्टिकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यात बाल कल्याण उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले. मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे. मुलांचे भविष्य व देशाचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन सुलोचना बाबर यांनी केले.तसेच पालक प्रतिनिधी लुनेश विरकर यांनी लहान चिमुकल्यांना विविध उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वैष्णवी मासाळ हिने मनोगत व्यक्त केले. बाल दिन या कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात विविध कलागुणांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कारंडे यांनी केले तर आभार कविता खाडे यांनी मानले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात बाल दिन साजरा
RELATED ARTICLES

