परळी: दिवाळी उंबरठ्यावर येऊनही पाऊस अद्यापही थांबायला तयार नाही. मात्र, या निमित्ताने धुक्यातील भटकंती सध्या पर्यटकांना, निसर्गवेड्यांना साद घालत आहे. चाळकेवाडी, वनकुसवडे परिसरातील पठारावर उतरणारे धुक्याचे ढग लक्षवेधक ठरत आहेत.
यंदा जिल्ह्याने उच्चांकी पाऊस अनुभवला. पावसाळ्यात ठिकठिकाणी पावसाने अगदीच कहर केला. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अर्थात अजूनही पाऊस थांबायला तयार नाही. दिवाळीचे दिवस तोंडावर येऊनही ढगाळ हवामानाचे चित्र आजदेखील कायम आहे. अशा स्थितीत जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडणारे धुके पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. एरवी पावसाच्या पार्श्वभूमीवर कास, ठोसेघर हे शब्द परवलीचे ठरतात. त्यात आता धुक्यातील पर्यटनाची भर पडताना दिसत आहे. मागे, पुढे, वर, खाली, अवतीभोवती धुकेच धुके. जणू धुक्याचे ढग जमिनीवर आले आहेत की काय? असा भास निर्माण करणारे चित्र पर्यटकांना प्रत्ययास येत आहे. त्यादृष्टीने चाळकेवाडी, वनकुसवडे परिसराची पर्यटकांना पसंदी मिळताना दिसत आहेत. ठोसेघर सोडले की काही अंतरावरच चाळकेवाडीचे विस्तीर्ण पठार येते. या पठारावरची डांबरी वाट थेट पाटणला पोचते. सुमारे 50 किलोमीटरचे हे अंतर आहे. दोन्ही बाजूला शेकडो पवनचक्क्यांची पाती भिरभिरताना दिसतात. हा सारा आसमंत धुक्याने वेढलेला असतो. परिसरात इतके दाट धुके असते, की अगदी दहा फुटांवरचे दृश्यही दिसणे कठीण ठरते. त्यामुळे अगदी दिवसाचेही वाहनचालकांना वाहनांचे दिवे लावणे क्रमप्राप्त ठरते. या पट्ट्यात अगदी दिवस-रात्र धुके कायम असते. परिसरात गावे, माणसांची वर्दळ अगदीच कमी आहे. पवनचक्क्या अन् धुक्याविना इथे दुसरे काहीच दिसत नाही. हा परिसर एवीच्या कोलाहलापासून दूर आहे. धुक्याच्या सोबतीला रस्त्याभोवतीची हिरवळ, फेसाळते प्रवाह पर्यटकांना भुरळ पाडताना दिसतात.
धुक्यातील पर्यटनाची पर्यटकांना भुरळ
RELATED ARTICLES