वार्ताहर
परळी
गेल्या आठवडय़ापासून जिल्हय़ात पावसाचा मारा हा तुरळक होत होता. मात्र दोन दिवसांपासून जिल्हय़ात पावसाची संततधार कायम असल्याने परळी खोऱयात शेतीच्या कामांना वेग आला असून भात लागण सुरु झाली आहे. वेळेत पावसाचे आगमन झाल्याने शेतकरीवर्ग सुखावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
परळी खोरे हा भाग तसा अतिवृष्टिचा त्याच बरोबर येथील निसर्ग सौंदर्य हे मन मोहून टाकते. सतत संततधार सुरु असल्याने भागाचे सौंदर्य आणखी खुलू लागले आहे. भागातील ठोसेघर, भांबवली, सांडवली, केळवली, ऐकीव धबधबे देखील फेसाळल्याने या ठिकाणी पर्यकांची रिघ सुरु झाली आहे. तसेच उरमोडी धरण क्षेत्रातही पाण्याची आवक ही वाढली आहे.