वार्ताहर
परळी
काही दिवसांपूर्वी भात शेती आणि सोयाबीनचे पीक पावसाअभावी करपून जाईल की काय अशी स्थिती होती डोंगर दऱ्यातील गावाने पाटाचे पाणी अडवून भात शेतीला देत होते पावसाने दडी दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. अशातच गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाच्या आगमनाने शेतकरीवर्ग सुखावला आहे.
ठोसेघर चाळकेवाडी परळी नित्रळ, पाटेघर, अलवडी तसेच कास पठारापर्यंत असलेले लघु प्रकल्प भरून वाहू लागले आहेत. उरमोडी धरण प्रकल्पातही पाण्याची वाढ होऊ लागली आहे. दिनांक 4 ऑगस्ट पासून ते 6 ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत 0.83 टीएमसी इतकी उरमोडी धरण पाणी पातळीत वाढ झाली आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2019 गतवर्षी 1660 मिलिमीटर पाऊस पडला तर 6 ऑगस्ट 2020 रोजी 639 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे म्हणजे सरासरी गतवर्षीपेक्षा यावर्षी 1020 मिलिमीटर पाऊस कमी पडलेला आहे.
गतवर्षी उरमोडी प्रकल्पात 91. 92 इतका पाणीसाठा होता तर यावर्षी 75.01 टक्के धरण भरले आहे सद्यस्थितीत 75. 80 टक्के धरण भरले आहे अशी माहिती उरमोडी धरण उपकार्यकारी अभियंता गणेश कणसे यांनी दिली आहे.
दरम्यान तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परळी ठोसेघर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे सज्जनगड रस्त्यावर झाड उन्मळून पडले आहेत तर आलवडी बांबर केळवली चिखली जांबे या रस्त्यांवर मोठमोठे दगड वाहून आलेले आहे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत.