पाटण दि. १८ – पाटणला आमदार नसताना ज्यांनी मोर्चे, आंदोलने करून रान उठवले त्यांनी तालुक्यात व राज्यात सत्ता मिळवल्यानंतर काय दिवे लावले हे तुम्ही पाहीले आहे. ज्यांना स्वतःच्या ताब्यातील एकमेव साखर कारखाना धड चालवता आला नाही त्यांनी या मतदारसंघाची वाट लावली. याउलट तुमच्या समोर आता प्रकल्प, उद्योग यातून रोजगार निर्माण करून चांगली दिशा देणारे सत्यजीतसिंह पाटणकर यांच्यासारखा उमेदवार आहे. एक सुदृढ, निर्व्यसनी व कोणताही नाद नसलेला हा उमेदवार विधानसभेत पाठवा त्यांच्या पाठीमागे मी माझी व पक्षाची ताकद पुर्णपणे उभी करेन असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी केले.
महाआघाडीचे विधानसभा उमेदवार सत्यजीतसिंह पाटणकर व लोकसभा उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ मल्हारपेठ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री आ. शशीकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर, सत्यजीतसिंह पाटणकर, प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, डाॅ. इंद्रजीत मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. शरद पवार पुढे म्हणाले राज्यात यावेळी सत्ता बदल निश्चितच होणार आहे यात पाटण मधून इतिहास घडवा. गतवेळी तुम्ही चुकीच्या लोकप्रतिनिधीला निवडून दिल्याने हा मतदारसंघ पाच नव्हे तर पंचवीस वर्षे मागे गेला. सत्यजीतसिंहांमध्ये प्रकल्प, उद्योग आणण्याची व ते यशस्वी करून हजारोंच्या संख्येने रोजगार व व्यवसाय निर्मिती करण्याची धमक आहे त्यामुळे आता तुम्हाला त्यांना निवडून देण्याशिवाय पर्यायच नाही. माणुसकी जपत सामान्यांना न्याय व सन्मान देणारा लोकप्रतिनिधीच येथे गरजेचा आहे. या पाटणच्या मातीन राज्याला पाणी व प्रकाश दिला ते देण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यानांच आज तहानलेलं ठेवणारांना धडा शिकवा. ज्यांना तुम्ही लोकप्रतिनिधी केलं त्यांनी त्यांच्या कारखान्याप्रमाणेच हा मतदारसंघ डबघाईला आणला. आघाडीच्या सत्तेच्यावेळी चोवीस तास वीज देण्यासाठी यांनी मोर्चे काढले त्यांनी सत्ता आल्यानंतर काहीच केले नाही. तुम्हाला शाप ठरलेलं हे नेतृत्व आता कायमचं घरी बसवा आणि येथे विकासाची गंगा आणण्यासाठी सत्यजीतसिंह पाटणकर यांना आमदार व श्रीनिवास पाटील यांना खासदार करा असे आवाहनही शेवटी खा. शरद पवार यांनी केले.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले गेल्या पाच वर्षांत युती शासनाने पाटण मतदारसंघावर अन्याय केला त्यांना आता त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. या शासनातील भ्रष्ट मंत्र्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ज्या खासदाराने तीनच महिन्यात तुमच्या मतांचा अपमान केला त्यांना आता कायमचे घरी बसवा. सत्यजीतसिंह व श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला विकासाची संधी मिळाली आहे त्याचे सोने करा. आमदार, खासदारच नव्हे तर तुम्हाला परिवर्तनातून राज्यात सत्ताबदल करायचा आहे.
श्रीनिवास पाटील म्हणाले विक्रमसिंह पाटणकर यांची विकासात्मक दूरदृष्टी यातून यापुर्वी झालेला विकास व रोजगार, व्यवसाय निर्मिती याचा वारसा पुढे नेण्यासाठी आता येथे सत्यजीतसिंह पाटणकर यांच्यासाठी मतांचा पाऊस पाडून येथे परिवर्तन घडवा पर्यटन, प्रकल्प, उद्योग यातून पाटणचा चेहरामोहरा बदलण्यासाठी येथे सत्यजीतसिंह व मला निवडून द्या.
विक्रमसिंह पाटणकर म्हणाले आ. देसाई यांना आमदारकी व साखर कारखाना अशी दुहेरी जबाबदारी पेलवत नाही त्यामुळे ते ना धड कारखाना चालवू शकत ना आमदारकीचा सकारात्मक वापर करू शकत त्यामुळे त्यांना आता आमदारकीच्या जबाबदारीतून स्थानिकांनी मुक्त करायची वेळ आली आहे. निदान त्यानंतर त्यांना ऊस घालणारया शेतकरी, कामगारांना तरी ते पूर्णवेळ न्याय देवू शकतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा यश देणारा असल्याने याच विचारांच्या दोन्ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या.
आ. शशीकांत शिंदे म्हणाले, खा. शरद पवार हे माथाडींसह राज्याचे दैवत आहेत त्यांनी येथे सत्यजीतसिंहांना सर्वतोपरी ताकद द्यायचे आश्वासन दिले आहे त्यामुळे आता यातून तुम्हाला सोने करायची संधी आहे. सत्यजीतसिंह पाटणकर यांना विक्रमी मतांनी निवडून द्या येथे चोवीस तारखेचा गुलाल जे . सी. बी. ने उधळा. येथे मतदान यंत्रातून फक्त घड्याळच बाहेर पडले पाहिजे याची खबरदारी घ्या.
.सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले १८०० कोटी विकासाच्या वल्गना करणाऱ्या संसदपटुंचा काॅपी पेस्ट जाहीरनामा आता जनतेनेच उघडा पाडला आहे. केवळ ठेकेदार व टक्केवारी यातून धनशक्ती उभारलेल्यांना आता आपण जनशक्तीतून धडा शिकवायचा आहे. ज्यांच्या सरकारच्या काळात यांच्याच कारखान्यावर जप्ती येते यावरूनच यांच्या कार्यसम्राट कार्यपद्धतीचा अनुभव आला आहे. त्यामुळे आता सन १९९९ सालची श्रीनिवास पाटील व पाटणकर अशी सार्वत्रिक विकासकामे करणारी जोडी पुन्हा निवडून देण्याची संधी मिळाली आहे. यातूनच येथे परिवर्तन घडवा. असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी हिंदूराव पाटील, सौ. सुरेखा पाटील, राजाभाऊ शेलार, सदाभाऊ जाधव, निवासराव पाटील, शंकर शेडगे आदीमान्यवरांची भाषणे झाली.
स्वागत तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी, सूत्रसंचलन सरचिटणीस सुभाषराव पवार यांनी तर आभार प्रदर्शन शंकर शेडगे यांनी केले. यावेळी अनेक मान्यवर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. सभेला राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस मित्र पक्ष महाआघाडीचे अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.