पाटण:- पिपंळगाव (कवरवाडी) येथील ह.भ.प. आत्माराम दत्तात्रय कवर यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. सार्वजनिक, सामाजिक तसेच अध्यात्मिक कार्यात सक्रिय सहभाग ठेवणारे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने पिपंळगाव – मुळगावसह पाटण तालुका वारकरी संप्रदायात सर्वत्र हळहळ
व्यक्त होत आहे.
ह.भ.प. आत्माराम दत्तात्रय कवर हे हसतमुख गावच्या सामाजिक व सार्वजनिक कार्यात हिरहुन्नरीने सहभागी होणारे व्यक्तीमत्व होते. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात देखील त्यांच्या मोठा सहभाग होता. गणेशोत्सव, दुर्गाउत्सव, यात्रा, ज्ञानेश्वरी पारायण, लग्न कार्य आदी सार्वत्रिक कार्यात सर्वांना बरोबर घेऊन यशस्वी पार पाडण्याचे कार्य त्यांनी केले. स्वतः निर्व्यसनी राहून तरुणांना आध्यात्मिक धड्यातून व्यसनमुक्यीचे संदेश नेहमी देत असत. वडील वैकुंठवाशी ह.भ.प. दत्तात्रय कवर (गुरुजी) यांचे कार्य अखंडित पुढे सुरु ठेवण्याचे कार्य ह.भ.प. आत्माराम कवर यांनी केले. पाटण तालुका वारकरी संप्रदायात देखील त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या निधनाने पिपंळगाव – मुळगावसह पाटण तालुका वारकरी संप्रदायात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ, बहिण, नातवंडे असा परिवार आहे.