* नेरळे, मुळगाव पुल दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली.
* पाटणच्या स्मशानभूमीला पूराच्या पाण्याचा वेढा.
* नदीकाठावरील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविले.
पाटण:- कोयना नदीला आलेल्या पूराचे पाणी पाटण शहरातील नदीकाठावर असणाऱ्या घरांमधून शिरु लागले आहे. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना सुरक्षिततेच्या कारणास्तव नदीकाठावर राहणाऱ्या कुटुंबांना पाटण नगरपंचायतीने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. कोयना धरण परिसरात पाऊस कायम चालू असून धरणात प्रतिसेकंद ५६ हजार ९०३ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. तर धरणातील पाणीसाठा ९३ टि.एम.सी. झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे १० फुटांवरच असून नदीपात्रात ५६ हजार ९०३ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. या पाण्याने कोयना नदी दुथडी भरून वाहत असताना नेरळे, मुळगाव पुल आज दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली आहेत.
नेरळे पुलावरून कोयना नदीचे पाणी वाहत असताना मोरगिरी भागाचा तर मुळगाव पुल पाण्याखाली गेला असताना कवरवाडी, मुळगाव, त्रिपूडी, चोपडी या गावांचा पाटण शहराशी संपर्क तुटला आहे. कोरोनाच्या संकटात पूराची भिती निर्माण झाल्याने ऐन गणपती – गौरी उत्सवाच्या तोंडावर जनजीवन विस्कळित झाले आहे. अशा परिस्थितीत नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे तर सुरक्षित असलेल्या नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे.
पाटण शहरात कोयना नदीला आलेल्या पूराच्या पाण्यामुळे केरा नदीला निर्माण झालेल्या पाण्याच्या फुगीने मार्केट यार्ड शेजारी असणाऱ्या भातगीरणीला व तेथील काही घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. तर कोयना काठावर असलेली स्मशानभुमिला देखील पूराचे पाणी लागले आहे. या परिसरातील कुटुंबांना पाटण नगरपंचायतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.
चौकट- १
कोरोनाच्या संकटात पूराची भिती ..
गेल्यावर्षी २०१९ ला जुलै औगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना नदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे विक्रमी २२ फुटांवर उचलून नदीपात्रात सरासरी एक लाख चाळीस हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. या पूर परिस्थिती मुळे कोयना काठ अक्षरशः पाण्यात बुडाला होता. पाटण सह अनेक गावांत पाणी शिरले होते. मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. नागरिकांचे हाल हाल झाले. या बरोबरच कृष्णा काठावरील सातारा जिल्ह्यातील कराड तालुका, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पूराचा मोठा फटाका बसला होता. हि भिती नागरिकांच्या मनात अजूनही कायम असताना आता पुन्हा एकदा चालू वर्षी देखील कोयना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे कोरोनाच्या संकटात पूराची भिती निर्माण झाली आहे.
चौकट- २
कोयना धरणात सध्या ९३ टि.एम.सी. पाणी साठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी २१५३.११ इंच तर ६५६.५१४ मीटर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ५६ हजार ९०३ इतकी असुन धरणाचे सहा वक्र दरवाजे १० फुटांवर उचलून नदीपात्रात प्रतिसेकंद ५६ हजार ९०३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या चौवीस तासात कोयना- २४१ मि.मी. (३४५९), नवजा- १७१ मि.मी.(३९४२), महाबळेश्वर- २४७ मि.मी. (३८९८) पावसाची नोंद झाली आहे.