Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीआयुष्यात पहिल्यांदाच काठी गाव बघणाऱ्यांनी आमची मापे काढू नयेत : विक्रमसिंह पाटणकर.

आयुष्यात पहिल्यांदाच काठी गाव बघणाऱ्यांनी आमची मापे काढू नयेत : विक्रमसिंह पाटणकर.

पाटण:- गेल्या चाळीस वर्षात दुर्गम आणि डोंगराळ भागातील रस्ते व तेथील नागरी सुविधा करण्यासाठी झगडलो. डोंगरपठावरील गावातील विकास कामे करताना लोकसंख्येचा कधीच विचार केला नाही. ज्यांना मागील १० वर्षा पुर्वीच डोंगरावरील रस्ते – विकास कोणी केला हे माहिती नाही. अशा तरुणांना भरकटून तुमच्या अविष्यात तुम्हाला पहिल्यांदाच काठी-अवसरी, काठीटेक, वनकुसवडे, मरड हि डोंगरावरील गावे निवडणूकीच्या तोंडावर दिसली. या आधी या गावांना कधी भेटी तरी दिल्या होत्या का? याच दुर्गम भागात रस्ते करताना तुमचा विरोध होता. तुमचा विरोध डावलून आम्ही केलेले रस्ते, या रस्त्यावरून प्रवास करता आणि पाटणकरांनी काय केले विचारता. आयुष्यात पहिल्यांदाच काठी गाव बघणाऱ्यांनी आम्ही केलेल्या विकास कामाची मापे काढू नयेत. असे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी आ. शंभूराज देसाई यांना पत्रकार परिषदेत सुनावले.

येथील शिक्कामॅन्शन या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, गेली १० वर्षे आमदारकी भोगत असताना दुर्गम भागातील गावे तुम्हाला कधी दिसलीच नाहीत. आता निवडणुका जवळ आल्याने तुम्हाला डोंगरपठारावरील गावांचा शोध लागला आहे. दुर्गम डोंगर माथ्यावर असलेल्या गावांत यापूर्वी तुम्ही कधीच गेला नाही. त्यामुळे तुम्हाला तिथे गांवे आहेत हे सुध्दा माहित नव्हते. पवनचक्की कंपनीच्या खर्चाने ज्यावेळी या विभागातील रस्त्यांची कामे करत होतो. तेव्हा तुम्हांला या डोंगरात माणसे राहतात का? याची सुध्दा माहिती घेण्याचे कष्ट कधी घेतले नाहीत. पवनचक्कीकडे जाणारे रस्ते हे पाटणकर करत आहेत म्हणून  तुम्ही या रस्त्यांच्या कामांना विरोध केला. आणि आता त्याच रस्त्यावरून जावून कामे झाली नाहीत म्हणून मापे काढता. त्या काळात शेकडो कोटींचे रस्ते केले म्हणून तुम्ही आज काठी गावात जावू शकला याचे तरी भान ठेवा.

माजी मंत्र्यांनी रस्ते केले म्हणून तुम्ही डोंगरमाथ्यावरील गावातून फिरू शकता. डोंगरमाथ्यावरील अनेक गावांमध्ये आम्ही केलेले चांगले रस्ते आहेत म्हणून तर तुम्ही भुमिपुजनाच्या कार्यक्रमाला फिरु शकता.

आमची मापे काढण्यापूर्वी आतापर्यत आयत्या पिठावर नागोबा म्हणून बसलेला आहात याचे भान ठेवा. गावा गावात दारूडी माणसे शोधून त्यांना दारू आणि मटण खाऊ घालण्यासाठी पथक नेमण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही. सत्ता मिळविण्यासाठी काहीही करणे हे तुमचे धोरणच आहे. उसाच्या पट्ट्यातील लोकांचे जीवन उद्‌ध्वस्त करून आता डोंगरपठारावरील जनतेच्या मागे लागला आहात हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. उसाच्या पट्ट्यातून शेतकऱ्यांनी  हकालपट्टी केल्याने आता वाड्यावस्त्यांवरील लोकांच्यात भांडणे लावण्याचा तुम्ही उद्योग सुरू केला आहे. हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.

आमच्याच जिल्हा परिषद सदस्यांनी मंजूर केलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या कामाचे भूमिपूजन करून फुकटचे श्रेय घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेत आमचीच सत्ता आहे. जिल्हा नियोजन समितीतही आमच्याच कार्यकर्त्याचे बहुमत आहे. त्यामुळेच ग्रामस्थांना विकासाची कामे मिळत आहेत. कोणत्याही कामाचे भुमिपूजन केले म्हणजे श्रेय मिळत नाही. कामाचे श्रेय हे जिल्हा परिषदेचे आहे. यापूर्वीच आम्ही काठी अवसरी याठिकाणी कोट्यवधी रूपयांचे पाझर तलाव बांधले आहेत याची तुम्हाला माहिती नाही. ती माहिती अगोदर करून घ्या. पोत्याने निधी मंजूर केला म्हणूनच रस्त्यांची कामे होवून आज तुम्ही काठी गावापर्यंत पोहोचू शकला.

तुम्ही भुमिपूजन केलेल्या पाटाचे काम आमच्याच अधिकारात जिल्हा परिषदेने केले आहे. काठी अवसरी गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी यापूर्वीच ३ कोटी ५० लाख रूपयाचा निधी मंजूर केला आहे. मात्र कोयना अभयारण्यातून १४ गांवे वगळण्याच्या प्रक्रियेमुळे काम थांबले आहे. यापूर्वी आम्ही कोयना अभयारण्यातून १४ गांवे वगळण्यासाठी मोर्चे, उपोषणे, आंदोलने केली आहेत. त्यामुळे आता लवकरच कोयना अभयारण्यातून १४ गांवे वगळण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाली की सदरच्या रस्त्याचे काम होणारच आहे. त्यासाठी तुमच्या निधीची आवश्कता नाही. असे शेवटी माजी मंत्री पाटणकर यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular