पाटणची श्रीलक्ष्मी देवी माता पार्वतीचे एक रुप असून जगाचे पालन करणारी व दुर्जनांचा नाश करणारी आहे. देवीच्या मुळ पाषाण मुर्तीचे अवलोकन केले तर ती राक्षसाला पायदळी घेऊन विजयी मुद्रेने त्यावर उभी असलेली सिंहासनावर अरुढ झालेली, हाती शस्त्र धारण केलेली अशी दिसते. म्हणून केरा-कोयना नदीकाटाच्या मुलखावर तिची क्रुपाद्रुष्टी आहे. ही देवी आपणास जगविते, जगाचे मंगल करते. याच आईच्या क्रुपेने पाऊस पाणी होतो. शेते पिकतात जिवणसुर्ष्टी फुलते. अशी आपली श्रद्धा आहे. म्हणूनच देवीच्या उंबरठ्यावर माथा टेकून तिची प्रार्थना करतात. दर्शन घेतात. पोराबाळांना सुखी ठेव अशी याचना करतात आणि नैवेद्य नारळ देऊन समाधानी होऊन परत जातात. येथील परिसराचे मनोहरी रुप, दीपमाळेची उंची, गच्च बहरलेली फुले आणि घंटेच्या, गुरवांच्या शिंगेचा निनाद भक्तांच्या तनमनावर भक्ती भावाची छाया पसरवतो. आणि आपसुकच त्याच्या तोंडी शब्द येतात * निनाई, लक्ष्मी, भैरीच्या नावान चांगभलं.*
पाटणची ग्रामदेवता श्रीलक्ष्मी देवी आहे. मात्र अग्रपूजेचा मान तिची बहिण श्रीनिनाई देवीचा आहे. म्हणून घोषणेत श्रीनिनाई देवीचा उल्लेख प्रथम येतो. श्रीनिनाई देवीचे मंदिर श्रीलक्ष्मी देवी टेकडीच्या पायथ्याशी गावातच आहे. आधी श्रीनिनाई देवीचे दर्शन घेऊन भाविक पुढे जातो. श्रीनिनाई देवीला एक भाऊ आहे. त्याचे नाव श्रीभैरी, भैरी म्हणजे भैरवनाथ. अर्थात कामथलिंग भैरवनाथ, भैरवनाथ पूर्वी हा देव पाटणच्या मुख्य पेठेतच वास करीत असे. त्यावेळी तेथे वस्ती नव्हती. झाडे-झुडपे माजली होती. लोक कचरा टाकीत त्यामुळे देव दुखावला आणि रागाने थेट सुंदरगड (दातेगड) च्या पायथ्याशी टोळेवाडी येथे जाऊन बसला. अशी जुन्या-जाणत्या लोकांकडून अख्यायिका सांगितली जाते. आता पाटण मधील त्याच्या मुळ ठिकाणी भैरवनाथाचे ठाणे म्हणून छोटेसे मंदिर उभारले आहे. भाविक येथे क्षणभर उभे राहून गुलाल टाकून दर्शन घेतात आणि टोळेवाडीकडे पाहून श्रीभैरीनाथाला नमस्कार करतात. अशा प्रकारे श्रीनिनाई, श्रीभैरीनाथाचे दर्शन घेतल्यावर आपण श्रीलक्ष्मी देवीच्या मंदिरात दर्शनाला जातो. १९८० पूर्वी श्रीलक्ष्मी देवीचे मंदिर पत्र्याचे सभोवती लाकडी खांब असलेले चौमोळी असे होते. १९८३ साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर आताच्या मुळस्वरुपात हे मंदिर उभे राहिले.
श्रीलक्ष्मीदेवीची यात्रा हि पाटण तालुक्यातील शेवटची यात्रा असते. यानंतर पाऊसकाळ सुरू होतो. शेतकऱ्यांना मशागतीची ओढ लागते. पाऊस चांगला होऊन शेती सम्रुध्द व्हावी अशी मनोमन प्रार्थना भूमिपुत्र देवीला करतात. दसऱ्याला केवळ देवीची पालखी मिरवणूक असते. मात्र यात्रेला देवीच्या छबिन्यावर टोळेवाडीहुन श्रीभैरीनाथाची पालखी येते. परंपरेनुसार देवस्थानामार्फत शेटे (देशमुख) टोळेवाडीकरांना निमंत्रणाचा नारळ देतात. व वैशाख शुद्ध नवमीला बहिणीच्या भेटीला येण्याचे निमंत्रण करतात. श्रीभैरीनाथाची पालखी पाटणच्या वेशीवर आल्यावर यात्रा कमिटी, गुरव, व ग्रामस्थ श्रीभैरीनाथाच्या पालखीचे स्वागत करतात. पालखी श्रीलक्ष्मी मंदिरात आल्यावर श्रीलक्ष्मी, श्रीभैरीनाथ अशा दोन पालख्या टेकडी उतरून सवाद्य मिरवणुकीने पाटण शहरातून यात्रा मिरवणूक काढतात. या पालखी मिरवणुकीचा थाट वेगळाच असतो. पुढे वादकांचा ताफा, पुढे भोईराजांच्या खांद्यावर श्रीलक्ष्मीदेवीची पालखी, पाठोपाठ श्रीभैरीनाथाची पालखी, पालखी सोबत गुलालाचा मळवट भरलेली भाविक, ग्रामस्थ. घरोघरी सुवासिनी पंचारतीने ओवाळून पालख्यांचे स्वागत करून देवीचे दर्शन घेतात. या पालखी मिरवणूक व यात्रा सोहळ्यात पुजारी म्हणून गुरव, पालखीचे वाहक भोईराज समाज, पालखीवर छायाछत्र धरणारा माळी समाज, नाडापुडीसाठी आतार, सुपदुरडी व आंबिल घुगऱ्यासाठी शेटे, अबदागीरसाठी नाभिक, पाणीपुरवठा साठी कोळी, चवरीसाठी चौधरी, गोंधळासाठी कुंभार, सामाधकाठीसाठी मुजुमले, धुपारतीसाठी ठाकर, दिवटीसाठी चर्मकार तर संरक्षणासाठी मातंग अशा बारा बलुतेदारांसह सर्व मानकऱ्यांचा या यात्रा सोहळ्यात समावेश असतो. हि सेवा असते या भावनेनेच हि सर्व मंडळी करत असतात.
*शंकर मोहिते- पाटण प्रतिनिधी.*
*दै. ग्रामोध्दार-सातारा.*