पाटण:- अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील दोन पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला. या दोन्ही घटनेचा पाटण तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध केला असून अलिबाग आणि जिंतूर येथील दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन पाटण तालुका पत्रकार संघाने पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले आणि डी.वाय.एस.पी. अंगद जाधवर यांना दिली आहेत.
येलगिरी ता. जिंतूर येथील पत्रकार प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे दै. सामाना मधे काम करीत असून पत्रकार प्रशांत मुळी दै.लोकमतचे काम करीत आहेत. दोघेही निस्पृहपणे, प्रामाणिक पत्रकार म्हणून तालुक्यात ओळखले जातात.. असं असताना साऱ्या कुटुंबाला जाळून ठार मारण्याचा कट कोणी रचला याबद्दल परिसरात चचा॓ सुरू आहे. पत्रकार प्रशांत मुळी यांच्या राहत्या घरात पहाटे सव्वा तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून आग लावली आग लागली त्या खोलीमध्ये कुटुंबातील सहा व्यक्ती झोपल्या होत्या परंतु वेळीच जाग आल्याने पुढील अनर्थ टळला. अज्ञात व्यक्ती इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घराच्या मागील बाजूस देखील पेट्रोल टाकून संपूर्ण घराला आग लावली होती. मुळी कुटुंबच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते परंतु सुदैवाने आग लागल्यावर प्रशांत मुळी यांचे बंधू प्रवीण मुळी यांना जाग आली त्यांनी आरडा ओरडा केला. त्यानंतर सारे कुटुंब जागे झाले आणि त्यांनी आग विझवली. या घटनेची फिर्याद प्रवीण मुळी यांनी जिंतूर पोलिसात दिली असुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४३२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तर अलिबाग जि. रायगड येथे २३ मे रोजी लोकसभा निवडणूक निकाला दरम्यान पत्रकार कक्षात घसुन दै. लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना आमदार जयंत पाटील व त्याच्या सहकार्याने मारहाण केली होती. या दोन्ही घटनेचा पाटण तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध केला असून दोन्ही घटनेतील आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाचे बाळासाहेब पवार, नितीन खैरमोडे, विद्या म्हासुर्णेकर, शंकर मोहिते, विक्रांत कांबळे, राजेंद्र लोंढे, प्रविण जाधव, दिनकर वाईकर, जयवंत यादव, संजय कांबळे, पि. के. कांबळे, विकास हादवे, सिताराम पवार यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
चौकट:-
पोलिसांना गांभीर्य नाही. – एस.एम. देशमुख.
येलदरी येथे मुळी कुटुंबावर एवढे मोठे संकट आल्यावरही घटनास्थळाला पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी वा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही दैव बलवत्तर म्हणून मुळी कुटुंब वाचले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असता परंतु घटना घडल्यानंतर ही पोलिसांना घटनेचे गांभीर्य वाटले नाही. किंबहुना फिर्यादीस चार तास पोलिस स्टेशनला ताटकळत बसावे लागले.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा निषेध केला असून या भयंकर कटामागे कोणाचा हात आहे हे शोधून काढण्यासाठी या प्रकाराची सीबीआय तर्फे चौकशी करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे. निवडणूक काळाल आपणास अनुकूल बातम्या दिल्या नाहीत म्हणून सातत्याने असे प्रकार घडत असावेत असा संशय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. सरकार पत्रकार संरक्षण कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्यानेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने पत्रकारांचे बळी जाण्याची वाट न बघता कायदा अंमलात आणावा अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.