पाटण:- पाटण तालुक्याने संपूर्ण महाराष्ट्राला विज दिली, पाणी दिल ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या सुखासाठी स्वतःच्या शेतजमीनीच बलिदान दिल. तोच पाटण तालुक्यातील धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त शेतकरी उध्वस्त होऊन देशोधडीला लागला आहे. गेल्या साठ वर्षांपासून धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कोणतेच सरकार व त्यांचे प्रशासन मार्गी लावत नसेल तर त्यांच्या भाषेतच सरकारने बांधलेली धरणे खेकडे फोडत असतील तर पाटण तालुक्यातील सगळ्या धरणात खेकडे सोडून धरणे फोडण्याचा घाठ शेतकरी करतील. म्हणूनच पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसीलदार यांच्या समक्ष खेकडे वाटप करत आहोत. असे खेकडा वाटप आंदोलन वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पाटण बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी सांगितले. सोमवार दि. 22 रोजी विक्रमबाबा पाटणकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्यासमवेत तहसीलदार रामहरी भोसले यांची तहसील कार्यालयात भेट घेतल्यानंतर त्याठिकाणी धरणग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तद्नंतर तहसील कार्यालयाच्यासमोर शेतकऱ्यांना खेकडे वाटप आंदोलन करण्यात आले.
ते पुढे म्हणाले पाटण तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे अनेक शेतकरी-प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागले आहेत. निष्क्रिय प्रशासक आणि प्रकल्पग्रस्तांचे बाबतीत असलेला अनादर यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे व पाणी असलेला पाटण तालुका आणि प्रकल्पग्रस्त कुटुंब उध्वस्त झालेले असून मानवतेच्या द्रुष्टिकोणातुन पाटण तालुक्यातील धरणग्रस्त- प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आठ दिवसात मार्गी लावण्याचा इशारा आपण महसूल विभागाला दिला होता. तरी देखील येथील प्रशासन झोपेच सोंग घेत आहे.
प्रकल्पग्रस्तांना पाण्याची आवश्यकता असताना राज्यकर्ते आणि सनदीअधिकारी स्वतःच्या कारभारामधे व्यस्त असुन यांना प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांची आवस्था पाहण्यासाठी वेळ नाही. निष्क्रिय प्रशासन व अधिकाऱ्यांच्या अनादारामुळे पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची दैनीय अवस्था निर्माण झाली आहे. व हा प्रकल्पग्रस्त शेतकरी शासनाच्या उदासीन मुळे उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या अशा परस्थितीला पुर्णतः प्रशासन व अधिकारी जबाबदार आहेत.
पाटण तालुक्यात सर्वाधिक शासनाने अडविलेले पाणी व त्याची केलेली विक्री व शासकीय अधिकाऱ्यांचा झालेला खर्च शासनाने आठ दिवसात जाहीर करावा असी देखील आपली मागणी होती. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती दिवस सरकार झोपेच सोंग घेणार आहे. खेकडा वाटप आंदोलन सरकारला इशारा देऊन झाले आहे. यापुढील शेतकऱ्यांच्या साठीचे आंदोलने उग्रस्वरुपात होतील असा इशारा देखील शेवटी विक्रमबाबा पाटणकर यांनी यावेळी सरकाला दिला. या आंदोलनावेळी आर.पी.आय. चे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रा. रवींद्र सोनावले, वामनराव साळुंखे, तुकाराम भोसले, भरत शिंदे, राजेंद्र सावंत, बाबासो सावंत, दादा कदम, रविंद्र देवकांत, किसन शिंदे, महिपती पवार, संजय शिंदे आदी शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.