पाटण:- काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळातील मंजूर कामेही पुर्ण करण्यात युती शासनाला अपयश आले असून तांबवे पुल हे याचे मुर्तीमंत उदाहरण आहे. माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला नवा पुल जर वेळेत झाला असता तर स्थानिकांचे हाल झाले नसते परंतु जनतेच्या सुख दुखाःशी आजच्या सत्ताधाऱ्यांना काहीही घेणेदेणे नाही. पण काळजी करू नका तुमच्या सुख दुखाःत मी नेहमीच तुमच्या पाठीशी राहीन आणि हा पुलाचा प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रयत्न करेन. अशी ग्वाही युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी दिली.
तांबवे पुलाच्या पाहणी दौरयाप्रसंगी ते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बोलत होते. यावेळी अशोकराज चव्हाण, निवासराव शिंदे, विश्वासराव निकम, पी. एल. माने, विश्वासराव कणसे, भानुदास कणसे, नारायण सुर्वे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले, तांबवे जुन्या पुलाला तत्कालीन उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांनी 19 फेब्रुवारी 2013 ला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पुलावरूनच संबंधित अधिकारयांना फोन लावून तातडीने याच्या दुरूस्तीबाबत सूचना केल्या व त्याचा पाठपुरावाही केला. त्यानंतर येथे नवीन पुल मंजूरीकरता आश्वासन दिले व तातडीने या पुलासाठी 13 कोटी अर्थसंकल्प अधिवेशनात मंजूरही केले. दरम्यान संगमनगर ( धक्का ) पुलासाठीही 13 कोटींची मंजूरी दिली त्या पुलाचे काम होवून आता तो दळणवळणासाठी खुलाही झाला आहे. या पुलामुळे स्थानिक तब्बल पस्तीस गावे, वाडय़ा- वस्त्यातील जनतेची कायमची गैरसोय दूर झाली. मात्र आघाडी शासनाच्या काळात मंजूर झालेला तांबवे नवा पुल पुर्णत्वाला नेण्यात ही मंडळी अपयशी ठरली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणारे व केवळ आश्वासने व घोषणा करणारे कोण हे आता स्थानिकांनी ओळखले आहे. मात्र सत्ता असो किंवा नसो आम्ही कायमच येथील जनतेच्या पाठीशी राहू आणि या पुलाचा प्रश्न तडीस नेवू. असेही यावेळी सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले.