पाटण :- गेले तीन दिवस बोर्गेवाडी येथील डोंगर गावाच्या दिशेने खचून ढासळत असताना याचे गांभीर्य शासनाने अथवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतले नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी बोर्गेवाडीच्या प्रश्नाबाबत झोपले आहेत. या गावातील माणस या देशातील आहेत का ? बाहेरून पाकिस्तानातून आलेत. बायका-पोरासकट जीव मुठीत घेऊन हि माणस इथ राहत आहेत. या लोकांनी जगायच का मरायच हे ऐकदा सांगा. हि माणस शासनाच्या अश्वासनाला वैतागली आहेत. ती आता तहसिल कार्यालयात येवून बसणार आहेत. त्यांच्या जेवणा-खाण्याची, राहण्याची सोय आता तुम्ही बघा. अधिकऱ्यांना माणसांच्या जिवा-पेक्षा मिटींगच महत्वाच्या असतील तर त्यांनी त्या खुशाल कराव्यात. मात्र पुढील होणाऱ्या परिणामाला या माणसांना जबाबदार धरु नका. असा सज्जड इशारा विक्रमबाबा पाटणकर यांनी बोर्गेवाडी ग्रामस्थांसोबत पाटण तहसिल कार्यालयात निवेदन देताना दिला.
बोर्गेवाडी ता.पाटण येथे डोंगर खचून गावच्या दिशेने ढासळलेल्या घटने बाबत सातारा जि.प.माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी ग्रामस्थ व नागरीकांसह पाटण तहसिल कार्यालयात निवेदन दिले. यावेळी विक्रमबाबा पाटणकर शासनाच्या गच्याळ कारभाराबाबत बोलत होते.
बोर्गेवाडी ता.पाटण येथील मुळ गावठाणाच्या शंभर फुटाच्या अतंरावर दहा ते पंधरा ऐकरातील डोंगर खचून दोन – तीन कि.मी. गावठाणाच्या बाजूने सरकल्याने पुन्हा एकदा माळीण गावची पुनरावृत्ती होण्याच्या भितीने एकच खळबळ उडाली आहे. एका बाजूला कडा ढासळण्याची भिती तर दुसऱ्या बाजूला डोंगर ढासळण्याची भिती बोर्गेवाडी गावाला निर्माण झाली आहे. गेले तीन दिवस गावच्या वरील बाजूस दहा ते पंधरा ऐकरातील डोंगर खचून ढासळलेला आहे. तरी देखील या झाल्या घटने बाबत शासन गांभीर्याने घेत नसून केवळ या तीन दिवसात गावच्या तलाठी यांनीच घटना स्थळी भेट दिली आहे.
१९९५ सालापासुन बोर्गेवाडी गावावर कडा कोसळण्याची टांगती तलवार आहे. निम्म्या गावठाणाचे पुनर्वसन तितेच बाजूला झाले आहे. तर निम्मे गावठाण पूर्वीच्या ठिकाणीच आहे. धोकादायक कड्याच्या बाजूला बोर्गेवाडी ते मेंढोशी या रस्त्या लगत ३१ जुलै बुधवार सकाळी सातच्या सुमारास दहा ते पंधरा एकरातील डोंगर खचून गावच्या बाजूने सरकत आहे. यामुळे बोर्गेवाडी सह मेंढोशी गावाला धोका निर्माण झाला आहे. घटनेने ग्रामस्थ भितीच्या छायेत आहेत. या घटनेने या डोंगरावर असणाऱ्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.