पाटण- मागील महिन्यात पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व कोयना नदीसह उपनद्यांना आलेल्या महापूरामध्ये शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह व्यापारी व्यावसायिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे नुकसान न भरुन येणारे आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे संपवून अतिवृष्टी व पुरपरस्थितीतील नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री कराड येथे आले असता विक्रमबाबा पाटणकर त्यांना भेटले. यावेळी खा. उदयनराजे भोसले, सुनिल काटकर, माजी जि.प.सदस्य मोहनराव पाटील, फत्तेसिंह पाटणकर, पंजाबराव पाटील, चैतन्य दळवी, अनिल बोधे यांची उपस्थिती होती.
अतिवृष्टी व पुरपरस्थितीमुळे अनेक गावांच्या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामध्ये बोर्गेवाडी, म्हारवंड, पाटवडे, चव्हाणवाडी, टोळेवाडी, जिमणवाडी, भैरोवाडी, विरेवाडी, गुजरवाडी आदी गावांचा समावेश असुन या गावांचे तातडीने पुनवर्सन करण्यात यावे. तोपर्यंत या गावांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात यावा. पुरपरस्थिती व अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे विहिरी, मोटरी, जमिनीचे खणन यांचे मोठे नुकसान आहे. तसेच पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हि नुकसान भरपाई सरसकट न देता. पिकांचा वेगळा पंचनामा व इतर बाबींचा वेगळा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. व्यापारी व व्यावसायिक वर्गाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांची स्थावर मालमत्ता आणि मालाचे वेगवेगळे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. असता लवकरच आपत्तीग्रस्त शेतकरी नागरिकांना शासनाकडून भरघोस मदत मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. असल्याची माहिती विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण येथे पत्रकारांशी बोलताना दिली.