पाटण:- जाहिराती बघून जनता फसली आणि भाजपा-शिवसेना सरकार आलं. मात्र जाहिराती बघून तेल आणि साबण घ्यायचा असतो मतदान नसतं करायचं. युतीने कर्जमाफी केली ती ही सरसकट नाही तर सहासष्ट अटी घालून शेतकऱ्यांना खेळवायचं काम केलं. मोका सबको मिलता है. आत्ता तो या जनतेला मिळालेला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आले की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या नागरी सुविधांची पूर्तता करणारचं. सर्वसामान्य नागरिकांचे सरकार सत्तेमध्ये आले पाहिजे. नुसतंच पट्टू असून चालत नाही. अठराशे कोटींचा विकास कागदावरती नको तो जनतेला दिसला पाहिजे. असा टोला लगावून श्रीनिवास पाटील यांना खासदार आणि सत्यजितसिंह पाटणकर यांना आमदार करण्यासाठी बहुमताने निवडून आणा. असे आवाहन खा. अमोल कोल्हे यांनी केले.
ढेबेवाडी (तळमावले) ता. पाटण येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील, पाटण विधानसभेचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर, कॉंग्रेसचे नेते हिंदूराव पाटील, सुजित पाटील, सभापती उज्वला जाधव, सौ. यशस्विनीदेवी पाटणकर, संजय देसाई, ऍड. अविनाश जानुगडे, माजी सभापती संगीता गुरव, कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा वंदना आचरे, रमेश मोरे, योगेश पाटणकर, तांबवे सुपने भागातील पंचायत समिती सदस्या सुरेखाताई पाटील, सुनंदा पाटील, डॉ. महेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. अमोल कोल्हे म्हणाले, सभेतील उपस्थिती पाहून विजय हा नक्कीच राष्ट्रवादीचा आहे. निवडणुकांमध्ये चूक झालेली सुधारण्याची संधी पाच वर्षांनी येते. मात्र तुम्ही भाग्यवान आहात ही संधी तुम्हाला सहा महिन्यात आली. शेतकऱ्याचा मुलगा आहे खुंटा बळकट केल्याशिवाय राहत नाही म्हणून परत पाटणला आलो. पंतप्रधान परदेशवाऱ्या करतात तेव्हा त्यांचे पोशाख परिधान करतात. मग महाराष्ट्रात येताना धोतराचा खोचा का बांधत नाहीत? महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती थांबली व देशाचा विकास घसरत चालला आहे हीच उभारी या सरकारने घेतली काय? पाटण तालुक्यातील तरुण मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्याला जात आहे. त्यामुळेच पाटणकर दादांनी तरूणांसाठी रोजगार निर्मितीचा विडा उचलला आहे. मतदारांनी मतदान करताना एकीकडे कमळ बघायचे तर दुसरीकडे धनुष्यबान त्यापेक्षा साधंसोपं घड्याळच बरं. येणारी निवडणूक ही लढाई असून ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. युती सरकारने पोलीस भरतीच्या 3हजार जागा काढून तरुणांची चेष्टा लावली आहे. आर. आर. आबांनी पोलिस भरती केलेले ६५ हजार कुठे आणि हे तीन हजार कुठे? मात्र सत्ता पालटण्याची ताकद या तरुणांच्यात आहे. मुख्यमंत्री म्हणतात कि, माझा समोर आखाड्यात आत्ता कोणी पैलवान नाही मग पंतप्रधान, अमित शहा, योगी आदित्य यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये कशाला घेत आहात? छत्रपतींचे नाव घेऊन जर कोण मत मागायला आले तर त्यांना विचारा कि, महाराजांच्या नावावरती अजून किती दिवस मत मागणार आहात? या युती सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवुन मतदानातून जागा दाखवा. श्रीनिवास पाटील यांना खासदार व सत्यजितसिंह पाटणकर यांना आमदार करण्यासाठी बहुमताने निवडून आणा. असे आवाहनही त्यांनी केले.
श्रीनिवास पाटील म्हणाले, लोकांनी मला आत्तापर्यंत लाखमोलाची साथ दिली आहे. पाटण तालुक्यात विक्रमसिंह पाटणकर यांनी पर्यटन विकास, नवीन महाबळेश्वर, कारखाना व अनेक छोटे-मोठे उद्योग धंदे यांची निर्मिती आज तालुक्यात केलेली आहे याची चर्चा सर्वात जास्त आहे. आज काल वयावरून जास्त चर्चा केली जात आहे. आमचं वयं तुम्ही कशाला विचारता. पृथ्वीराज चव्हाण आपला माणूस आहे. त्यांना सत्यजितसिंहांना आणि मला मते द्या कायापालट करून दाखवू. मला प्रशासकीय कामांचा अनुभव असल्याने समाजाच्या विकासासाठी निधी कसा उपलब्ध करावा यांची आपल्याला माहिती आहे. शितावरून भाताची परिक्षा होते. माझ्या कामाची पध्दत सर्वांना ज्ञात आहे. गेल्या दहा वर्षातील निष्क्रिय कारभार विसरू नका. मतदारसंघात विकासकामासाठी एक रूपया दिला नाही आणि विरोधक मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. जनाधाराचा अपमान करून निवडणूक लादल्यामुळे सामान्य माणसाच्या उठावातून या निवडणूकीत विजय निश्चित आहे, असे स्पष्ट केले.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, आज राज्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र मंदी आहे. रोजगार निर्मितीची खंत आहे. या अगोदरच्या आमदारांनी अनेक आश्वासने दिली होती. त्यांचा जाहिरनामा म्हणजे कॉपी पेस्ट आश्वासने आहेत. तालुक्यात 1800 कोटींची कामे आणली म्हणून विरोधक सांगत आहेत. पण अठराशे कोटीत किती शुन्य असतात हे ही संसदपट्टूंना सांगता येणार नाही. या अठराशे कोटींचा तालुक्यातील जनताच पंचनामा करत आहे. त्यांच्या भूलथापांची पोलखोल करून दाखवायची आहे. जागोजागी भूमिपूजनाच्या पाट्या लागल्या असून त्याजागी वाळू, खडी पडली आहे. मात्र उद्घाटनाचे वा भूमिपूजनाचे कार्यक्रम होत नाहीत. भूमिपूजनाचे कार्यक्रम होतात ते ही प्रस्तावित कामांचे. रोजगार निर्मितीला खीळ घालण्याचे काम विरोधकांनी केले आहे. रोजगार निर्मितीसाठी नवीन महाबळेश्वर प्रकल्प व कारखाना निर्मिती करत आहोत. दीड महिना झाला अतिवृष्टी होऊन तरीही ओला दुष्काळ जाहीर करायला या निष्किय आमदारांना जमले नाही. मला प्रश्न पडतो की यांना ससंदपट्टू केलं कोणी? संसदपट्टूच्या कारखान्यावर जप्ती कशी काय येऊ शकते. तालुक्यात टक्केवारीची नवीन रीत पडली आहे. संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपती हे धोरण आमदारांचे आहे. आता गाफील राहू नका. जोमाने कामाला लागा कारण तुम्ही जनता खासदार व आमदार होणार आहात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, सुपनेच्या पंचायत समिती सदस्या सुरेखाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन जाधव यांनी सुत्रसंचालन व स्वागत केले. संजय देसाई यांनी प्रास्ताविक केले. रमेश मोरे यांनी आभार मानले. सभेस ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी व राष्ट्रीय कॉंग्रेसच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.