Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसागर खोत याचेच नाव "चुकून" आले असे सांगण्याच्या पाठीमागे नेमके गौडबंगाल...

सागर खोत याचेच नाव “चुकून” आले असे सांगण्याच्या पाठीमागे नेमके गौडबंगाल काय.?

पाटण:- संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहिला गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यात संशयित आरोपींच्या यादीत महाराष्ट्र राज्याचे क्रुषि राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत याचे नाव सहा नंबरला फिर्यादीने दिले आसताना केवळ सागर खोत याचेच नाव “चुकून” आले असे सांगण्याच्या पाठीमागे नेमके गौडबंगाल काय.? कडकनाथ घोटाळा प्रकरणी सकाळी १०.३० वा. गुन्हा दाखल होतो. आणि संध्याकाळी ६ .०० वा. सुमारास कोणत्याही चौकशी विना सागर खोत यांचे नाव बाजूला केले जाते. केवळ मंत्र्यांचा मुलगा म्हणून या नावाला कलाटणी दिली का.? कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार का ? असा प्रश्न सागर खोत याच्या नावावर पोलिसांनी घेतलेल्या “यू र्टन” बाबत सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कोट्यावधीची फसवणूक केलेल्या कडकनाथ प्रकरणी दररोज नवे खुलासे होत असताना शुक्रवारी पाटण पोलिसांनी घेतलेल्या “यू टर्न’मुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता नाकरता येत नाही. राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा आणि सांगली भाजपा युवा मोर्चाचा अध्यक्ष असलेल्या सागर खोत याच्याविरोधात सातारा जिल्ह्यातील पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटण पोलिसांनी अजब स्पष्टीकरण देत सागर यांचे नाव चुकून फिर्यादीत टाकले असल्याचे सांगून या प्रकरणात नव्या वादाला फोडणी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील जवळपास ७३ शेतकऱ्यांनी महा रयत या कंपनीच्या कडकनाथवर भरवसा ठेवून अंडी उत्पादन व कोंबडी पालन अशा व्यवसायात १ कोठी ४८ लाख २३ हजार ५१९ रुपयांची गुंतवणूक केली आहे. कडकनाथ कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाटण पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाला गती मिळाली होती. त्यानंतर पाटण पोलिसांनी सागर खोत याच्यासह पाचजंणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर कोयनेच्या पाण्यातून असा काय बुडबुडा आला त्याने चक्क फिर्यादीतून सागर खोत याचे नावच वाहून गेल्याची परिस्थीती निर्माण केली. यावर पाटणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावने यांनी सागर यांचे नाव चुकून फिर्यादीत आल्याचे अजब असे स्पष्टीकरण दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे बोलले जात आहे. कारण अतंत्य अद्यायवत असणाऱ्या पोलिसांच्या संगणक प्रणालीद्वारे एखादा गुन्हा दाखल होत असताना आणि शेतकऱ्यांनी सागर खोत यांचे नाव सांगितले असतानाही पोलीस मात्र सागर खोत याचेच नाव चुकून आल्याचे सांगत असतील तर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या बाबतीत मात्र “चुकून” हा शब्द पोलिस स्टेशनला कधी येतच नाही. आला तरी या शब्दाला चौकशी, कारवाई, अटक, कस्टडी कोर्टाच्या फेऱ्या न्यायालयीन निकाला अंती “चुकून” निर्दोष सुटलाच तर नशीब.. नाहीतर शिक्षा-दंड याला सामोरे जावे लागणारच.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular