जलसंपदा खात्याने दिला खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने निर्णय
फलटण: निरा देवघरच्या नियमबाह्य जाणार्या 60 टक्के पाणी रोखण्याच्या सुरू असलेल्या वादावर अखेर जलसंपदा खात्याने पाणी रोखण्याचे आदेश देऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने निर्णय देत बारामतीकरांना एक प्रकारे शह दिला आहे. या राखीव पाण्याचे वितरण आज वीर धरण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा परिषद सदस्य सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा डाव्या कालव्यातून जाणारे नियमबाह्य पाणी बंद करणार असे जाहीर करताच पाण्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी माढयाला हक्काचे पाणी देणारच असे जाहीर केले होते त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. माढयाला हक्काचे पाणी मिळावे म्हणून नवनियुक्त माढा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता बारामती व इंदपूरला जाणारे 60 टक्के पाणी हे माढयाला देण्याचा आदेशच जलसंपदा विभागाने काढला आहे. या आदेशानंतर वीर धरण येथें पाणीपूजन करून आनंद व्यक्त करण्यात आला. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा-देवघर प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील तालुक्यांना मिळवुन दिल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. याबाबतचा आदेश मा. ना. गिरीशजी महाजनसाहेब यांच्या स्वाक्षरीने निघाला असून आदेश स्वीकारण्यासाठी मुंबई येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, श्रीकांतभाऊ देशमुख स्वतः उपस्थित होते.
नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती व इंदपूरला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश देणार असल्याचे यापुर्वीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. यानंतर माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ही घेतली होती. परंतु नियमबाह्य पाणी बंद करण्याबाबतचा शासकीय आदेश आज काढण्यात आला. 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करार संपल्यानंतर देखील नियमबाह्य पाणी बारामती तालुक्याला देण्यात येत होते. दिले जाणारे पाणी पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला मिळावे अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार माहिते पाटील यांनी केली होती. शासनाने आज आदेश काढल्याने बारामतीचे पाणी आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
पाणीपूजन व पाणी सोडते वेळी माणचे आमदार जयकुमार गोरे, माळशिरसचे नेते उत्तमराव जानकर, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील, सांगोल्याचे भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्या अॅड. सौ जिजामाला नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, सौ. मंदाकिनी नाईक निंबाळकर, सौ मंगलादेवी नाईक निंबाळकर यांच्यासह सह निरा देवघर लाभ क्षेत्रातील शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव झाला सादर
खासदार निंबाळकर यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकार्यांसमवेत चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव पाठविला होता. बारामती परिसराला देण्यात येणार्या पाण्याचा करार 2017 मध्ये संपुष्टात आला आहे. नीरा डावा कालव्यातून बारामती परिसराला बेकायदा पाणी दिले जात होते.
त्यामुळे हे पाणी माढा मतदारसंघाकडे वळवावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. नीरा डावा कालव्याअंतर्गत लाभक्षेत्र असलेल्या फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यांना कमी पाणी मिळत होते. मात्र, आता हे पाणी या भागात वळविण्यात येणार आहे.
पाणी प्रश्नावर राजकारण रंगणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाणी प्रश्नाबाबत जलसंपदा विभागातील अधिकार्यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी जलसंपदा अधिकार्यांची भेट घेतली. त्यावरून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी प्रश्नावर राजकारण रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
काय आहे पाणी प्रश्न?
वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचं धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरलं होतं. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होतं. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होतं. 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला.
त्यामध्ये निरा देवघर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला आणि 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. करार संपल्यानंतरही हे पाणी बारामतीला जात होतं.
निरा देवघरचे नियमबाह्य पाणी अखेर रोखलेच ;
RELATED ARTICLES