फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर मान्यवरांकडून उत्साहात स्वागत
फलटण (अशोक भोसले) :
चला पंढरीस जाऊ!!
रामनगरीतून जाता जाता शंभू महादेवाला बेल फुल वाहू !!!
माझ्या महादेवाला डोळे भरून पाहू!!!
विठू रायाचा सानिध्यात राहु!!!
असे म्हणित लाखो वारकरी भाविक प्रभू श्रीरामांच्या नगरीत पोहोचले ……
पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने ज्ञानोबा माऊली तुकाराम….तुकाराम सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा आज गुरुवारी दि.4 जुलै रोजी प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व संपूर्ण महाराष्ट्र भर महानुभाव व जैन पंथीयांची काशी ओळखल्या जाणार्या ऐतिहासिक फलटण नगरीत मुक्कामासाठी विसावला. या वेळी सर्वांनी आपल्या लाडक्या माऊली भक्तांचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले.
तरडगाव येथील पालखी तळावरुन सकाळी 6 वाजता सोहळ्याच्या प्रस्थानानंतर हा सोहळा सुरवडी येथे न्याहरी, निंभोरे येथे दुपारचे जेवन व वडजल येथे विसावा घेवून व पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्विकार करुन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत सायंकाळी फलटण शहरात दाखल झाला या वेळी फलटण शहराच्या हद्दीवर नगराध्यक्षा नीता नेवसे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे,मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी स्वागत केले.
तरडगाव येथून तरडगाव करांनी जड अंतकरणाने आपल्या लाडक्या माऊलींना व लाखो वारकर्यांना निरोप दिला या नंतर या माऊली सोहळ्याचे सुरवडी येथे साळुंखे पाटील परिवाराच्या वतीने स्वागत केले. यावेळी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी स्वागत केले तर निंभोरे येथे स्वराज उद्योग समुहाचे शिल्पकार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर मित्र मंडळ व यांनी व सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामस्थ यांनी स्वागत केले तर वडजल येथे ग्रामस्थांनी स्वागत केले.
टाळ मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात विठु दर्शनाची आस घेऊन निघालेल्या या सोहळ्याचे फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर नगराध्यक्षा निता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी पदाधिकारी आदी माण्यवरांनी स्वागत केले. माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो सगुणामातानगर (मलठण)सदगुरु हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने जि.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह लाखो भाविकांच्या जनसमुदायाचे स्वागत आदी माण्यरांनी केले. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, सफाई कॉलनी,गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमान तळावर मुक्कामासाठी विसावला.
या ऐतिहासिक वारीत सहभागी असलेल्या लाखो वारकर्यांसह शहर व तालुक्यातील नागरीकांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. समाज आरती नंतर माऊलींच्या दर्शनासाठी फलटणरांनी मोठ्या रांगा लावल्या. फलटण शहरातील ऐतिहासिक राम मंदिर व जबरेश्वर मंदिर येथेही दर्शनासाठी वारकरी व महिलांनी रांगा लावल्या होत्या.
यावेळी पावसाने हुलकावणी दिलेली असल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा वारीत सहभागी झालेल्या वारकर्यांच्या संखेवर परीणाम जाणवत होता. आज पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरात सर्वत्र मउत्सव आनंदाचा चैतन्याचा,स्फुर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचाफ असे वातावरण होते. पालखी सोहळ्याचे आगमन शहरात जरी संध्याकाळी झाले असले तरी वारकर्यांचे बुधवार दिनांक 3 जुलैच्या सकाळपासुनच शहरात मोठ्या प्रमाणात वारकर्यांचे आगमन होत होते.
या वेळी मराठवाडा, विदर्भ भागातील अनेक भाविक भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी असतात या मुळे हे वारकरी संप्रदायाचे लोक मोठा महादेव म्हणून परिचित असलेल्या शिखर शिंगणापूर कडे जाताना दिसले कारण या ठिकाणी जाऊन दर्शन करून ते बरड/नातेपुते या दोन्ही पैकी एका ठिकाणी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पुढल्या मार्गावर जात असतात या मुळे शिखर शिंगणापूर ला जाणार्या मार्गावर अनेक वारकरी जात असल्याचे दिसून आले होते.
सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जयघोष व भगव्या पताका या मुळे अवघे फलटण शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य सर्वत्र दिसुन येत होते. शहरात दिवसभर विविध सहकारी व सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे व फलटणवासीयांकडून ठिकठिकानी मोफत चहा व बिस्किटे, अल्पोपहार, फळेवाटप, जेवणाची सोय तसेच मोफत आरोग्य सेवा, मोबाईल फोन चार्ज करुन देणे, आदी उपक्रम वारकर्यांसाठी राबविण्यात आले होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्यांच्या सेवेसाठी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्नशील असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते.
दरम्यान वारकर्यांना अडचणी येवु नयेत म्हणून पोलीस/महसूल/नगरपालिका व इतर विभागाचे अधिकारी यांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देत होते तसेच फलटण मार्गावर अनेक ठिकाणी भाविक वारकर्यांना आंघोळीसाठी सोय करण्यात आली होती.या करीता नीरा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे आंघोळ व कपडे धुण्याची उत्तम सोय झाली. वारकर्यांसाठी पिण्यास पाणी टँकरद्वारे पुरविण्यात आले. पालखी तळावर व शहरात ठिकठिकाणी फिरती शौचालये व स्वच्छता गृहे उभारण्यात आली होती. पुरवठा विभागाच्या वतीने पालखी तळावर गॅस सिलेंडर व रॉकेल उपलब्ध करुन देण्यात आले होते.
आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप करण्यात येत होते. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा खंडित होणार नाही याची व्यवस्था केली होती. वारकर्यांच्या समस्यांचे व तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालखी तळावर नगर पालीकेच्या/पोलीस/महसूल विभागाच्या वतीने मदत केंद्र कक्ष उभारण्यात आले होते
दरम्यान शुक्रवारी सकाळी 5 रोजी फलटण येथून सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव येथे विसावा घेवुन हा सोहळा सातारा जिल्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी 5 वाजता दाखल होणार आहे. शनिवार दिनांक 6 जुलै रोजी हा वैष्णवांचा मेळा दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
पंढरपुराकडे प्रस्थान करणारा लाखो वैष्णवांचा मेळा ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला
RELATED ARTICLES