फलटण: फलटण तालुक्यातील अपप्रवृत्तींना कायमचा पायबंद घालण्याची वेळ आली असून सध्या सुरु असलेले लोकसभा अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येक महिन्यात जनता दरबार भरवून सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेवून त्यांची लगेच सोडवणूक करण्यात येणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
सासवड ता. फलटण येथील जयजवान, जयकिसान चारा छावणीस सदिच्छा भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर आयोजित छोटेखानी सभेत खासदार बोलत होते. यावेळी विलासराव झणझणे, राजेंद्र काकडे, जयकुमार शिंदे, अॅड. नरसिंह निकम, सुशांत निंबाळकर, तुकाराम शिंदे अतुल गायकवाड, सुरेश भोईटे, लहुराज मोहिते यांच्यासह हिंगणगाव गटातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. सभेपूर्वी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.
तालुक्यातील अपप्रवृत्तींना आता कायमचा पायबंद घालणार असून कोणाची कसलीही तक्रार अथवा अडचण आल्यास त्याचे तातडीने निराकरण करुन संबंधीतांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न असून अधिकारीवर्गानेही पक्षपातीपणा न करता सर्वसामान्यांच्या हिताचे काम केले पाहिजे तसे झाले नाही तर संबंधीत अधिकार्यांविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्याचा इशाराही यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.
प्रारंभी राजेंद्र काकडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात हिंगणगाव गटातील सद्यस्थिती, पावसा अभावी शेती व शेतकर्यांचे होत असलेले नुकसान, शेतीची सद्यस्थिती व त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी वगैरे सविस्तर विवेचन केल्यानंतर पाणीदार खासदार म्हणून परिचय झालेले. रणजितदादा यांनी या सर्व प्रश्नांची माहिती असल्याने खासदार झाल्यापासून तडफेने कामास सुरुवात करुन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेल्या ठोस भूमिकेबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करीत तालुक्याच्या पश्चिम भागातील कायम दुष्काळी पट्टयाला न्याय देण्यासाठी नीरा-देवघरचे पाणी लवकरात लवकर लाभक्षेत्रात पोहोचले पाहिजे अशी आग्रही मागणी केली.
विलासराव झणझणे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
‘अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येक महिन्यात जनता दरबार भरविणार’
RELATED ARTICLES