Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीयंत्रणांबाबत असलेल्या तक्रारी स्वतंत्र बैठका घेवून सोडविण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट निर्देश

यंत्रणांबाबत असलेल्या तक्रारी स्वतंत्र बैठका घेवून सोडविण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट निर्देश

फलटण: विविध पाटबंधारे प्रकल्प बाधीतांसाठी लाभक्षेत्रातील स्वखुशीने दिलेल्या जमीनींपैकी ज्यांचा अद्याप वापर झाला नाही आणि मूळ मालकांनी या क्षेत्राचा मोबदला घेतला नाही अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याच्या मागणीबाबत प्रस्ताव सादर करण्याचे तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलासाठी भूखंडाची मोजणी विना मोबदला करण्याचे, छावणीची बीले त्वरित अदा करण्याचे आणि अन्य यंत्रणांबाबत असलेल्या तक्रारी स्वतंत्र बैठका घेवून सोडविण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिले आहेत.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहर व तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांकडील प्रलंबीत कामे मार्गी लावणे, सार्वजनिक व खाजगी स्वरुपाचे प्रशासनाकडील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, फलटण येथे आयोजित आढाव बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर होते.
यावेळी माजी आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, युवराज शिंदे, पै. बजरंग गावडे, माऊली सावंत, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत, रेल्वेचे कार्यकारी अभियंता खान, प्रांताधिकारी फलटण संतोष जाधव, प्रांताधिकारी माण-खटाव दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार फलटण हनुमंत पाटील, तहसीलदार माण श्रीमती माने, सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण किशोर माने, कार्यकारी अभियंता धोम-बलकवडी साळुंखे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राऊत, कार्यकारी अभियंता वीज वितरण फलटण विभाग वग्यानी, जिल्हा उपनिबंधक काकडे, आगार व्यवस्थापक एसटी फलटण आगार राजेंद्र कुंभार यांच्यासह तालुक्यातील शासकीय यंत्रणांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वखुशीने जमिनी देताना
पाण्याची अपेक्षा होती
नीरा-देवघर, धोम-बलकवडीसह जिल्ह्यातील अन्य पाटबंधारे प्रकल्पाद्वारे विस्थापित होणार्‍या कुटुंबांसाठी गावठाण उभारणी आणि लाभ क्षेत्रातील जमिनी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर त्यावेळी फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्वखुशीने लाभक्षेत्रातील जमिनी दिल्या त्या पाठिमागे उर्वरित क्षेत्राला प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याची आशा होती मात्र प्रत्यक्षात लाभक्षेत्रातील या जमिनींना अद्याप पाणी पोहोचले नसल्याने सदर जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्यात अशी मागणी तालुक्यात जोर धरत असतानाच खा. नाईक निंबाळकर यांनी मेळावा घेवून प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिल्याने संबंधीत शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी लेखी अर्जाद्वारे मागणी केली आहे जिल्हाधिकार्‍यांनी त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला दिले असून सदरच्या जमिनी परत मिळणार असल्याच्या शक्यतेने लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे.
पुर्नवसीत गावठाणांची
पाहणी करावी
प्रत्यक्षात लाभक्षेत्रात पाणी पोहोचले नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी इकडे अल्प प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रकल्प ग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुर्नवसीत गावठाणे आणि तेथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 13 नागरी सुविधांची पूर्णत: वासलात लागली आहे. इमारतींच्या दारे खिडक्या जाग्यावर नाहीत. वीजेच्या तारा व ट्रान्स्फार्मरची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही पाणी पुरवठा योजना जागेवर दिसत नाहीत हातपंप तुटले आहेत. अशा परिस्थितीत या पुर्नवसीत गावठाणातील मूळ गावालगतच्या क्षेत्राला मोठी किंमत असल्याने त्याबाबत काही चूकीचे निर्णय झाल्याचे बोलले जात असून त्याचाही प्रशासनाने आढावा घ्यावा अशी मागणी होत आहे.
लाभक्षेत्रात पाणी
नसल्याने जमिनी परत करा
प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात दिलेल्या जमिनी पाण्याअभावी पडून असल्याने त्याबाबतही जरी शासनाने मूळ मालकांना पैसे दिले असले तरी सदरचे पैसे परत देवून जमिनी ताब्यात घेणार्‍या मूळ मालकांना त्याबाबत योग्य संधी दिली पाहिजे अशी अपेक्षाही काही ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे.
रेल्वेसाठी संपादित राहिलेल्या क्षेत्राचे पैसे देणार
लोणंद-फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनी व्यतिरिक्त अन्य जमिनींच्या किंमती अद्याप निश्‍चित नसल्याचे या बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी सस्तेवाडी, कांबळेश्‍वर व खुंटे या गावातील क्षेत्रापैकी सस्तेवाडी गावातील क्षेत्राचे मुल्यांकन बाकी असल्याचे तर कांबळेश्‍वर व खुंटे गावातील संपादन क्षेत्राच्या मोजणीबाबत तक्रारी असल्याने त्याबाबत संबंधीतांकडून अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त होताच संपादन प्रक्रिया पुढे सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले.
आवास योजनेसाठी
मोजणी फी नाही
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांसाठी जमिन मोजून देताना भूमी अभिलेख विभाग मोठ्या प्रमाणावर मोजणी फी ची आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आणून देताच अशा लाभार्थ्यांना मोजणी फी आकारु नये असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. तर तालुक्यातील जावली व सासवड येथील चारा छावण्यांची बीले मिळणेबाबत निवेदनावर सदर बिलांची तपासणी लेखाधिकार्‍यांमार्फत सुरु असून त्यांचा अहवाल येताच बीले अदा करण्याचे आश्‍वासन प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी दिले.
पाणंद रस्त्यासाठी प्रसंगी खासदार निधीतून पैसे देणार
फलटण तालुक्यातील पाणंद रस्त्यांची खडीकरण व मुरमीकरणाची कामे तातडीने हाती घेवून सदरचे रस्ते वाहतूकीसाठी खुले करण्याच्या मागणीवर त्यासाठी 50 हजार रुपयांचा निधी शासकीय यंत्रणेमार्फत उपलब्ध होत असून त्यापेक्षा अधिक निधीची गरज भासल्यास खासदार फंडातून सदरची रक्कम उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन देत सदरचे रस्ते तातडीने खुले करण्याचे निर्देश खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.
लिंगायत समाज दफनभूमी प्रश्‍नांची तातडीने सोडवणूक करा
लिंगायत समाज दफनभूमी परिसरात वाळूच्या उद्देशाने उत्खनन झाल्याने सदरची दफनभूमी अस्तित्वात राहिली नाही तेथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाने दफनभूमीची जागा निश्‍चित करुन कुंपन भिंत घालुन जमिन सपाटीकरण करुन द्यावे अशी मागणी केली. त्याचप्रमाणे कोळकी येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर या दोन्ही ठिकाणचे प्रश्‍न तातडीने सोडवून दफनभूमी व स्मशानभूमी सुस्थितीत उपलब्ध करुन देण्याच निर्देश संबंधीत यंत्रणांना देण्यात आले.
पोलीसांकडील तक्रारीसाठी शनिवारी विशेष बैठक
पोलीस यंत्रणेने शहर व तालुक्यातील गुन्हेगारी काबुत ठेवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेवून कडक कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांना मोकळे रान देवून दहशत माजविण्याची संधी देवू नये अशी मागणी केली असता उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी याबाबत आपण स्वत: लक्ष घातले असून अनेक गुन्ह्यांचा तपास लागला आहे, गुन्हेगारांच्या बाबतीत हद्दपारी आणि मोक्का सारख्या कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शनिवार दि. 7 रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येत असून तेथे आपल्याकडील चोरी, जबरी चोरी, वाहनचोरी व अन्य गुन्ह्याबाबत ज्यांनी अद्याप तक्रारी दाखल केल्या नाहीत त्या लेखी स्वरुपात द्याव्यात संबंधीत गुन्हेगारांना शोधून काढण्यात पोलीस यंत्रणा मागे राहणार नाही याची ग्वाही उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिली.
प्रवाशांची अडचण
होवू देणार नाही : एसटी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) माध्यमातून होत असलेली प्रवासी वाहतूक सुरळीत आणि समाधानकारक नसल्याच्या, वेळापत्रकाप्रमाणे बसेस धावत नसल्याच्या, बसेस नादुरुस्त आणि प्रवासी वाहतुकी योग्य नसल्याच्या तसेच सकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणार्‍या आणि दुपारी घराकडे पोहोचविणार्‍या एसटी बसेस नियमित नसल्याने विद्यार्थ्यांची विशेषत: विद्यार्थीनींची मोठी कुचंबना होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर एसटीच्या अधिकार्‍यांनी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मान्य करीत मात्र त्याबाबत आता वेळापत्रक योग्य पध्दतीने तयार करुन सर्व बसेस वेळेवर जातील विशेषत: विद्यार्थ्यांना कसलीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले.
शेतीपंपाची वीज जोडणी
मागणी पूर्ण करा
वीज वितरण कंपनीने गेल्या अनेक वर्षापासून शेतीपंपाची नवीन कनेक्शन्स दिली नसल्याने अनेक शेतकरी पैसे भरुन वीज कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र शेतात पीके उभी आहेत, विहीरीत पाणी उपलब्ध आहे, शेजारुन वीज वाहिनी जात असताना या शेतकर्‍यांना वीज जोडणीची वाट पहावी लागत असल्याने त्यांनी अनधिकृतपणे वीज जोडण्या घेतल्या असल्या तरी त्याबाबत कार्यवाही करण्याऐवजी सदरच्या वीज जोडण्या नियमित करुन देण्याची मागणी करण्यात आली. त्याबाबत प्रांताधिकारी यांच्या दालनात वीज वितरण कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांची बैठक घेवून योग्य तोडगा काढण्याचे निर्देश खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले. वास्तविक सदरची अनधिकृत कनेक्शनस सुरु असताना वीजेचा पुरवठा सुरळीत रहातो मात्र वीज जनित्र (ट्रान्सफर्मर) लोड वाढल्याने जळतात अशा ठिकाणी जादा क्षमतेचे किंवा अधिक संख्येने जनित्र बसवून शेतकर्‍यांना वीज पुरवठा केला पाहिजे अशी सूचना करतानाच वीज जनित्र (ट्रान्सफर्मर) जळाल्यानंतर थकीत वीज बीलाची मागणी करुन शेतकर्‍यांची अडवणूक न करण्याचे निर्देशही यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular