फलटण: श्री गणेशोत्सव कालावधीत अनंत चतुर्दशीदिवशी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरीक, महिला, लहान मुले यांना फलटण पोलीसांनी विनाकारण केलेल्या लाठीचार्ज व मारहाणीच्या निषेधार्थ शहरातील गणेश मंडळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवूनही संबंधित अधिकारी यांच्याविरुध्द कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी जयंती दिनी बुधवार दि.2 आक्टोंबर पासून शहरातील सर्व गणेश मंडळे व भक्त आणि नागरीक आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती फलटण नगरपालिका नगरसेवक अनुप रमणलाल शहा यांनी दिली.
फलटण येथील विसर्जन मिरवणूकीवर पोलीसांनी लाठीचार्ज करुन महिला, लहान मुले व नागरीक यांना गंभीर जखमी केल्याच्या निषेधार्थ व सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर दळवी व संबंधीत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत हॉटेल आर्यमान येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमिरभाई शेख, रविवार पेठ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल पोतेकर, शिवाजी चौक गणेशोत्सव मंडळाचे बबलूशेठ मोमीन यांची उपस्थिती होती.
फलटण येथील श्री गणेश विसर्जन मिरवणूक गजाजन चौक, जब्ररेश्वर मंदिर व राममंदिर, श्रीराम चौकी येथून जात असताना शहरातील व परिसरातील नागरीक, महिला, लहान मुले यांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती तथापी फलटण शहर व ग्रामीण पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर दळवी व पोलीस कर्मचारी यांनी गणेशोत्सव मिरवणूक पाहणार्या नागरिक, महिला व लहान मुले व युवकांवर अमानुषपणे लाठी हल्ला करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या या मारहाणीमुळे कोणाला काहीच समजले नाही त्यामुळे त्याठिकाणी मोठा गोंधळ उडून अनेकजण मारहाणीत गंभीर जखमी झाले असल्याचे अनुप शहा यांनी निदर्शनास आणून दिले.
शिवानी जनरल स्टोअर्स बादशाही मस्जिद शुक्रवार पेठ जब्रेश्वर व गजानन चौक येथील 5 ठिकाणी पोलीस यांनी केलेल्या लाठीचार्ज व मारहाणीमध्ये लहान मुले, युवक, महिला व नागरिक हे गंभीर जखमी झाले असून या घटनेच्या निषेधार्थ शहरातील गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवार दि. 17 सप्टेंबर रोजी निवेदन देवूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने आम्ही शहरातील गणेशोत्सव मंडळ, नागरीक व महिला यांच्यासह गांधी जयंती दिनी आमरण उपोषणास बसणार असल्याचे नगरसेवक अनुप शहा यांनी सांगितले. श्री गणेशोत्सव अथवा अन्य उत्सवामध्ये शांततेची गेल्या अनेक वर्षाची शहराची परंपरा असून काही पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी फलटण शहराची सांस्कृतिक परंपरा मोडीत काढून नागरीक, महिला व लहान मुले यांच्यावर लाठी हल्ला केला असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगून ह्युमनराईट अल्पसंख्याक आयोग, बालहक्क महिला आयोगाकडे जावून दाद मागणार असल्याचे नगरसेवक अनुप शहा यांनी सांगितले. लाठीचार्ज व मारहाण करणारे पोलीस यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शुक्रवार पेठ, रविवार पेठ, नवचैतन्य, मलठण, उमाजी नाईक, दगडीचाळ, जब्रेश्वर, झुंझार, गजानन चौक सार्वजनिक, महाराणा प्रताप, लक्ष्मीनगर व नेहरु गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून लढा उभारण्यासाठी आम्ही येथील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी कटीबध्द असून रक्षकच जर भक्षक होत असतील तर लोकशाहीमध्ये न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल उपस्थित करून पोलीस यांनी मंडळ पदाधिकारी यांना फोन करून मागे हटविण्यापेक्षा ज्यांनी चुक केली आहे त्याला पाठीशी घालू नये अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व गणेश मंडळ निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतील असा इशारा शेवटी अनुप शहा यांनी दिला आहे. गणेशोत्सव मंडळ आपापली मंडळाची मिरवणूक शांततेत काढून पुढे जात असताना फलटण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अचानक मिरवणुक पाहण्यासाठी आलेली लहान मुले महिला तरुण व नागरीक यांना मारहाण करून लाठीचार्ज केल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
आमच्या मंडळाचा टक्टर लांबून वळवित असताना ज्ञानेश्वर दळवी यांनी तो जवळून वळविण्यास सांगितला व तो अडकला यामुळे दळवी यांनी आमचे नगरसेवक यांचे गचुरे धरले. मात्र मिरवणुक शांततेत जात असताना त्यानंतर शहरातील 5 ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने लाठीचार्ज केला असल्याचे रविवार पेठ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल पोतेकर यांनी सांगितले.
रविवार पेठ गणेशोत्सव मंडळ व शहरातील सर्व मंडळे सण उत्सव शांततेचा अवलंब करून साजरे करीत असताना मात्र काही पोलीस अधिकारी यांनी शहरातील शांतता भंग व्हावी या उद्देशाने मारहाण केल्याचे सांगून संबंधित पोलीस यांचेवर त्वरित कारवाई झाली नाही तर आम्ही सव गणेशोत्सव मंडळे महात्मा गांधी जयंती दिनी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असून आगामी विधानसभा निवडणुकीवर सर्व गणेशोत्सव मंडळ बहिष्कार टाकणार असल्याचे पोतेकर यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांनी प्रास्ताविक करुन पोलीस यांनी केलेल्या मारहाणीची माहिती देवून त्यांच्यावर लवकर कारवाई झाली नाही तर दि. 2 ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून शेवटी आभार मानले.
‘गणेश विसर्जन मिरवणूक’ प्रकरणी संबंधित अधिकार्यांविरूध्द कारवाईसाठी आमरण उपोषण
RELATED ARTICLES