फलटण: ज्यांनी बायका बदलल्या त्यांना पक्ष बदलायला काय अवघड आहे? मागच्या वेळेस दिगंबर आगवणे हे शेवटच्या क्षणाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उभे होते, आता इकडून, अशी टीका महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्यावर केली. दरम्यान, आणखी एक आनंदाची बातमी उपळवेकरांना लवकरच मिळणार आहे,लवकरच उपळवेकरांवरील दहशत संपणार आहे. जशी डेअरी विकली तसा कारखानाही आता विकायला काढला आहे. मी म्हणत होतो ते खरेच आहे, हे दुसरे विजय मल्ल्याच आहेत, असे म्हणत ना. श्रीमंत रामराजे यांनी खासदार रणतिजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निक्षून टीका केली.
उपळवे (ता. फलटण) येथे आयोजित केलेल्या आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कोपरा सभेत ना. श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, वेळोशीचे माजी सरपंच सुरेश रोमण, सोपानराव जाधव, प्रदीप लंभाते, बाळासाहेब लंभाते, बाळासाहेब सपकाळ, मल्हारी जाधव, प्रदिप सावंत, सतिश जाधव, विनायकराव गोडसे, रवी पिसाळ, बापूराव गोडसे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. ना. श्रीमंत रामराजे म्हणाले, 1996 पासून यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. मलठणपासून आम्ही यांची गुन्हेगारी बघत आलो आहे. आम्ही आमचे काम करत राहिलो. या तालुक्यात आम्ही विकासाला कोठे कमी पडलोय, हे जनतेने दाखवून द्यावे. तालुक्याच्या कानाकोपर्यात आम्ही विकास पोहोचवला आहे. आम्ही केलेला विकास तुम्ही आगवणे साहेबांच्या हातात महालक्ष्मीच्या दर्शनाला नेले म्हणून देणार आहात का? आज दर्शनाला नेलयं, आता काही दिवसात साड्या देतील.ज्यांना दूरदृष्टी नाही. ज्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. अशी माणसे असे लोभ दाखवून मते मिळवतात. अशा माणसांच्या हातात हा तालुका तुम्ही देणार आहात का? असा सवालही ना. श्रीमंत रामराजे यांनी केला.
माझ्या पंचवीस वर्षांत प्रामाणिकपणे मी धोम-बलकवडी आणले आहे. तालुक्याचा विकास केला आहे. पंतप्रधान मोदी जेंव्हा मुख्यमंत्री होते तेंव्हा धोम-बलकवडीवर त्यांचाही विश्वास नव्हता. त्यांचाच कशाला कोणाचाच विश्वास नव्हता. जेंव्हा धोम-बलकवडीचे काम सुरु झाले तेंव्हा गाड्याच्या गाड्या पाठवून आम्ही धोम-बलकवडीचे सुरु असलेले काम दाखवले आहे. पण, यांना कशाचे काही घेणे देणे नाही.
विकासाचा आणि यांचा काही संबंधही नाही. बरडला असाच एक माणूस होता. ज्याच्याकडे हातभट्टीचा व्यवसाय होता. तो गावावर अत्याचार करत होता. त्या माणसाला गावाने गुळाच्या गाडीत टाकून गावाबाहेर काढले. उपळवेकरांनो, तुमच्यावर अत्याचार होत असेल तर तुम्ही तोंड उघडा. आज तेरा नंबर खोली आहे, उद्या भर रस्त्यात मारतील. तुम्ही पुढे या, मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे.दिगंबर आगवणे हा उमेदवार निवडून येणार नाही. मोदी जरी आले तरी तो निवडून येणार नाही. लोकांनाही माहितीये, त्यांना निवडून देण्यात अर्थ नाही. दीपक चव्हाण हेच निवडून येणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे ना. श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
उपळवेकरांनो, तुमच्यावरची दहशत लवकरच कमी होणार आहे. कारण, जशी डेअरी विकली तसा कारखानाही हे विकणार आहेत. मी जे बोलतो ते तुम्हाला समजल नव्हत. विजय मल्ल्यावर हजारो कोटींची कर्जे आहेत. ह्यांच्यावरही कोट्यावधींची कर्जे आहेत. म्हणून मी ह्यांना फलटणचा विजय मल्ल्या म्हणतो. कर्जबाजारी होवूनच यांनी डेअरी विकली. आता, कर्जबाजारीपणामुळे कारखाना विकणार आहेत, हे विसरु नका. काही महिन्यांनंतर हा कारखाना विकल्यावर फटाके वाजवा, मी देखील येईन तुमच्या आनंदात सहभागी होईन, असे म्हणत ना. श्रीमंत रामराजे यांनी खासदार रणजितसिंह यांच्यावर टीका केली.
मतदानाच्या आधीचे शेवटचे तीन दिवस सबंध फलटण तालुक्यात लोकसभेला जसे पैसे वाटले गेले तसे होईल. ते पैसे द्यायला आले की फोटो काढून आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांच्याकडे बघून घेतो. दरम्यान, श्रीमंत विश्वजीतराजे, रामभाऊ ढेकळे, सोपानराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्यांनी बायका बदलल्या त्यांना पक्ष बदलायला काय अवघड आहे: ना.रामराजे
RELATED ARTICLES