Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीरामराजेंच्या नेतृत्वावरच पुन्हा जनतेचा विश्वास....खासदारांना करावे लागणार आत्मचिंतन

रामराजेंच्या नेतृत्वावरच पुन्हा जनतेचा विश्वास….खासदारांना करावे लागणार आत्मचिंतन

फलटण (शक्ती भोसले): फलटण विधानसभा मतदार संघात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे प्रभुत्व पुन्हा सिध्द झाले असून या विजयाने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे सलग तिसर्‍या वेळेस विधानसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत. भाजपचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या पराभवास अंतर्गत कलह कारणीभूत ठरला असून आगवणे यांच्या पराभवामुळे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना आत्मचिंतन करावे
लागणार आहे.
फलटण विधानसभा मतदार संघ हा राखीव असून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार दीपक चव्हाण हे गेली दहा वर्षे येथील जनतेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. 2014 पासून राज्यात सर्वत्र भाजपची लाट असली तरी सातारा जिल्हा त्यास अपवाद ठरला होता. परंतु माढा लोकसभा निवडणूकीत भाजपाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय प्राप्त केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार्‍या एकहाथी सत्तेस तडा गेला होता. फलटणच्याही जनतेस भाजपाच्या रुपाने सक्षम पर्याय मिळाला होता.
यंदाच्या निवडणूकीत फलटण विधानसभा मतदार संघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच्या दिवसापर्यंत महायुतीचा उमेदवार कोण? कुठल्या घटक पक्षाला हा मतदारसंघ सोडण्यात आला? हे स्पष्ट झाले नव्हते.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेली दहा वर्षे आमदार असलेले दीपक चव्हाण यांनाच पुन्हा संधी दिली. महायुतीचा उमेदवार घोषित होईपर्यंत अनेक घडामोडी घडल्या परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले वजन दिगंबर आगवणे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. दिगंबर आगवणे यांच्या रुपाने जनतेसमोर चव्हाण यांना सक्षम पर्याय मिळाला होता. विशेषकरुन ग्रामीण भागातील जनतेतून आगवणे यांनाच आपला पाठींबा असल्याची उघड चर्चा होत होती. सुरुवातीस मतदार संघात भाजपाची असलेली हवा पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर चिंतेचे सावट होते. सातारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व फलटण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्याने भाजपाचे वातावरण अधिक मजबूत झाले होते. परंतु महायुतीतून दिगंबर आगवणे यांना उमेदवारी मिळू नये याकरीता पक्षांतर्गत काही कार्यकर्त्यांचा गट कार्यरत होता.
आगवणे यांना उमेदवारी मिळाली तर उघड विरोधाची भूमिका घेवू असे काहीजण खासगीत बोलूनही दाखवित होते. फलटण येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेत आगवणे यांना विरोध दर्शविणारी मंडळीच व्यासपिठावर वावरल्याने आगवणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते चांगलेच दुखावले गेले. मतदार संघात भाजपाची हवा पसरली असली तरी राजकीय डावपेचात मुरब्बी असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले डावपेच लढविण्यास सुरुवात केली व त्यामध्ये ते यशस्वीही ठरले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघ पिंजून काढला. गटांतर्गत असणारे गटतट एकत्र करण्यात ते यशस्वी ठरले तर विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सत्यजीतराजे नाईक निंबाळकर हे युवकांना राजेगटाकडे आकर्षित करुन वळविण्यात यशस्वी ठरले.
निवडणूकीत भाजपाच्यावतीने 370 कलम हटविल्याचा मुद्दा प्रामुख्याने प्रचारात होता. तर राष्ट्रवादीकडून नोटबंदी, बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे मुद्दे प्रचारात होते. फलटण तालुक्यात स्थानिक पातळीवरील मुद्दे न घेता व्यक्तिगत पातळीवर टिकाटिप्पणी करण्यातच धन्यता मानल्याने जनतेतही नाराजी होती.
फलटण तालुक्यात धनगर व माळी समाजाचे प्रमाण सर्वाधिक आहे परंतु विद्यमान सरकारवर या समाजाची असणारी नाराजी राष्ट्रवादीसाठी फायदेशीर व निर्णायक ठरली. स्थानिक पातळीवरील विचार करता फलटण तालुक्यातील साखरवाडी कारखान्याचा न सुटलेला प्रश्न, बागायती पट्ट्यातील व उत्तर कोरेगावमधील 26 गावांमध्ये आगवणे यांनी केलेल्या कार्यामुळे या भागातून त्यांनाच भरघोस मतदान मिळेल असे चित्र होते परंतु काहीही असले तरी जनतेचा आपल्यावर असणारा विश्वास ढळू न देण्यात रामराजे नाईक निंबाळकर यशस्वी ठरले त्याची परिणीती आमदार दीपक चव्हाण यांच्या विजयात झाली.
वातावरण चांगले असूनही पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण करणारे कार्यकर्ते, काम कमी व नेतेमंडळींपुढे पुढे करणार्यांविरोधात सोशल मीडियावर खासदारांच्या जवळच्या कार्यकर्त्याने कडक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यास अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी उघड पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे जनमत चांगले असूनही दिगंबर आगवणेंसारख्या लढवय्या नेतृत्वास पराभव का स्विकारावा लागला याची कारणीमिमांसा करुन या पराभवाचे त्यांना आत्मचिंतनही करावे लागणार आहे. अशा प्रतिक्रिया त्यांच्याच कार्यकर्त्यांमधून व जनतेतूनही व्यक्त होत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular