सातारा: अतिवृष्टीमुळे कृषि क्षेत्राचे, घरांचे पंचनामे करण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तेचे पंचनामे करा. ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. तिथे प्रत्यक्ष प्रांतांनी जाऊन पहाणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिल्या.
आमदार शंभुराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थित आज पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्ती बाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. या बैठकीला प्रांताधिकारी हिम्मत खराडे, श्रीरंग तांबे, पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले, कराडचे तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पूर बाधित गावातील कुटुंबांना अन्न धान्याबरोबरच केरोसिनचे वाटप तात्काळ सुरु करा. ज्या गांवामध्ये पंचनामे होणार आहेत अशा गांवामध्ये आदल्यादिवशी दवंडी द्यावी. पंचनाम्यासाठी कर्मचारी कमी पडत असतील तर त्याची मागणी करा ते तात्काळ उपलब्ध करुन दिले जातील. कोणत्याही पूरग्रस्त बाधित गावांना दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्या. या गांवामध्ये पाणी उकळूनच प्यावे याबाबत जनजागृती करा. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हवा असल्यास त्याची मागणी करावी. पंचनामे करण्यासाठी एक वेळापत्रक तयार करा त्यानुसार पंचनामे करा व पंचनामे करताना गावातील लोकप्रतिनिधींनाही सोबत घेऊन जावे. रोगराई वाढू नये म्हणून पूरग्रस्त बाधित गावातील नागरिकांची आरोग्य् तपासणी करा. तसेच पशुसंवर्धन विभागानेही पशुधनाची तपासणी करावी. अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.
मुंद्रुळ हवेली, जमदाडवाडी, नावडी या गावात जिल्हाधिकार्यांमार्फत रोख रकमेचे वाटप
मुंद्रुळ हवेली, जमदाडवाडी, नावडी, ता. पाटण या गावातील पूरग्रस्त बाधितांना आमदार शंभुराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते 5 हजार रोख रकमेचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुंद्रुळ हवेली, जमदाडवाडी, नावडी या गावातील पूर बाधित एकही कुटुंब शासनाच्या निधीपासून वंचित राहणार नाही प्रत्येक कुटुंबाला अन्न धान्य आणि केरोसिनचा पुरवठा केला जाईल. तसेच अतिवृष्टी व पूर परिस्थितीत बाधित घरांचे शंभर टक्के पंचनामे केले जातील. तसेच शासनाच्या निधीपासून कोणीही वंचित राहणार नाही. याची दक्षता घेतली जाईल. आता 5 हजार रुपये रोखीने देण्यात येणार असून उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे, असे त्यांनी नागरिकांना यावेळी सांगितले.
महापुरामध्ये सार्वजनिक मालमत्तेची हानी झालेली असेल तर त्याचेही पंचनामे करा: जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES