सातारा: उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूकीत अंतर्गत विरोधाची धार कमी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे. पुरूषोत्तम जाधव यांचा विरोध कमी करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. अशा सेफ गेममधून उदयनराजे यांचा प्रचार सुरू असताना राष्ट्रवादीच्या घडयाळाची टिकटिक मात्र ऐकू येईनाशी झाली आहे. सातारा व जावली तालुक्यात भाजपचे एकहाती वर्चस्व निर्माण झाल्याने राष्ट्रवादीला होमग्राउंडवर झगडावे लागतेय. भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांच्या रूपाने आव्हान निर्माण केलं आहे. निवडणूकीच्या डबल बारमध्ये विधानसभेची परीक्षा शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी सोपी असली तरी लोकसभेचा अवघड पेपर उदयनराजे भोसले यांच्यासाठी आहे. कराड उत्तर, सातारा व कोरेगाव या तीन मतदारसंघांनी उदयनराजे यांना1 लाख29 हजार मतांचे लीड नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिले होते.
मात्र सातारा वगळता इतर दोन तालुक्यात उदयनराजे यांची खर्या अर्थाने परीक्षा असणार आहे. जावली व सातारा तालुक्यतील379 गावांचे सव्वातीन लाख मतदान आहे. त्यात दीपक पवार आमदार शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील यांचे प्रभाव गट असल्याने मतांची कॅटफाईट जोरात बघायला मिळणार आहे. जावलीत कुडाळ तर सातार्यात शेंद्रे व कारी गटावर बरीचशी राजकीय गणिते अवलंबून आहेत. खेड व लिंब या दोन गटात आमदार शशिकांत शिंदे व शिवेंद्रराजे भोसले या दोघांचाही प्रभाव आहे. तोच ट्रेंड माहुली, खावली, महागाव येथे राहिल्यास शिंदे समर्थकांची नाराजी लपून रहात नाही. म्हणूनच या भागातून खासदारकीला उदयनराजे यांचे मतदान वीस टक्क्याने घटले होते. सातारा शहरातील पेठांमध्येही मतदानांची टक्केवारी समाधानकारक आहे असे खात्रीने म्हणता येत नाही. गोडोली, विलासपूर संभाजीनगर या उपनगरांनी हात दिल्यावरच मतदानाच्या आघाडीचे गणित जुळते. राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार यांना उपनगरातूनच मताधिक्याचे गणित जुळवावे लागणार आहे . म्हणूनच राष्ट्रवादीच्या सात पैकी चार पदयात्रा एकदम सातारा शहरात न ठेवता शाहूपुरी, कोंडवे, सैदापूर या लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत .
सेफ गेमची मोठी कसरत
सातारा लोकसभा मतदारसंघ हा युतीत पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेकडे होता. मात्र उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता ही जागा भाजपकडे गेली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी सातार्यातून आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभा असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण केलं होतं. हे आव्हान आणि मतविभागणीचा फटका टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उदयनराजेंकरिता पुरूषोत्तम जाधव यांना थांबवावे लागले. खंडाळ्यात ही अनौपचारिक बैठकीत नितीन भरगुडे पाटील यांच्याकडून परवलीचा शब्द उदयनराजे यांना मिळालाच नाही. एकीकडे राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली आहे. उदयनराजेंसमोर मतविभाजन होण्याचा धोका भाजपच्या डॅमेज कंट्रोलमुळे संपला आहे.
उदयनराजेंसमोर राष्ट्रवादीचं आव्हान
खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत सातार्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी, या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना आपण पराभूत होऊ शकतो, ही भीती आहे का?, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. सातार्यातील राष्ट्रवादीच्या इतर आमदारांशीही उदयनराजेंनी कधी जुळवून घेतलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई कामी आली. पण आता उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा मुख्य संघर्ष हा राष्ट्रवादीविरोधात होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या लढतीत, हे बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भाजपाचा ‘सेफ’ गेम तर राष्ट्रवादीचा होमग्राऊंडवर संघर्ष
RELATED ARTICLES