सातारा (डॅनियल खुडे): सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत नुकताच उदयनराजे भोसले यांचा पाऊण लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला. या पराभवाचे विश्लेषण अनेकांनी अनेक प्रकारे केले. परंतु बारकाईने या निवडणुक प्रक्रियेकडे बघितल्यास उदयनराजे यांचा पराभव खा. श्रीनिवास पाटील अथवा शरद पवारांनी केला असे वरवर वाटत असले तरी खोलवर या निवडणुकीचा अभ्यास केल्यास उदयनराजे भोसले यांनीच उदयनराजे भोसले यांचा पराभव केला आहे. कसा ते थोक्यात पाहू.
उदयनराजे भोसले यांनी आत्तापर्यंत अनेक जय-पराभव पाहिलेत व ते पचवलेत देखील परंतु हा जो काय पराभव आहे. त्याला फक्त अन् फक्त उदयनराजे भोसलेच जबाबदार आहेत. जनता नाही ! कारण जनतेने सव्वालाख मतांनी त्यांना तीन महिन्यापूर्वीच खासदार म्हणून घड्याळ्याच्या चिन्हावर निवडून दिल्ली दरबारी पाठवले होते. मात्र तीन महिन्यातच उदयनराजेंना आपण चुकीच्या पक्षातून निवडून आलोय असे वाटू लागले की त्यांना त्यांच्या काही निवडक कार्यकर्त्यांनी तसे भासवण्यास सुरुवात केली. त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनाच माहित असो.
ज्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अंतर्गत सर्व आमदारांचा विरोध पत्करुन शरद पवारांनी राजेंना उमेदवारी दिली त्यावेळी आपल्या प्रचारात उदयनराजेंनी मोदी व शहा या जोडगोळीवर टीकेची झोड उठवली. आत्तापर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याने केली नसेल एवढी टीका उदयनराजे भोसले यांनी केली. जनतेनेही त्यांना याबदल्यात सव्वालाख मतांनी निवडून आणले परंतु निवडून आल्यावर राजे काही खूष नव्हते हे काय मताधिक्य झाले? असे त्यांचे वाक्य होते.
कारण 2014 ची लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही उदयनराजे प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले होते. त्याआधीच्या निवडणुकीतही राजे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते त्यामुळे तीन महिन्यापूर्वी मिळालेले मताधिक्य त्यांना खूप कमी वाटायला लागले व हा विजय देखील त्यांनी साजरा केला नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीत रामराजे, शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे यांच्यातील कलह कमी होण्याचे नाव घेत नव्हते. परंतु प्रत्येकवेळी शरद पवार उदयनराजेंचीच पाठराखण करीत होते कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या होत्या व स्टार प्रचारक म्हणून उदयनराजे भोसले पवारांच्या डोक्यात होते. उदयनराजे भोसलेंचेच पवार ऐकतात त्यामुळे अखेर शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादी सोडली व भाजपवासीय झाले.
अशावेळी उदयनराजेंना राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक बनून अनेकांना अडचणीत आणण्याची नामी संधी चालू आलेले होती. परंतु म्हणतात ना विनाशकाली विपरीत बुध्दी अशीच काहीशी अवस्था उदयनराजेंची झाली व शिवेंद्रसिंहराजे पाठोपाठ त्यांनी पवारांना सोडचिठ्ठी दिली व मोदीमय झाले व येथेच त्यांनी जनतेला गृहित धरण्याची मोठी चूक केली.
ज्या मोदी-शहा जोडगोळीवर टीकेची झोड उठवणारे राजे आता त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घालताना जनतेला राहवलेले नाही. ‘अगर मैने एक बार कमिटमेंट कर ली तो खुद की भी नही सुनता’ असे सांगणारे राजे आता असे काही वागू लागले की जनता म्हणून लागली हे आमचेच उदयनराजे आहेत ना? यांनी का असा निर्णय घेतला व तेव्हापासूनच जनतेचा पारा चढला.
समोर कोणता उमेदवार आहे हे न पाहता आपल्या लाडक्या राजाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय या जनतेने मनोमन केला. सातारा तालुका वगळता अन्यत्र जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्यांची मते घटलेले दिसली.
श्रीमंत छत्रपती ही उपाधी मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठी असल्यामुळे राजेंना कधीच आमदार, खासदार व मंत्री यांची लालसा राहिली नाही परंतु लोकशाहीत जनतेची कामे करायची असल्यास लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यावे लागते म्हणून राजे निवडणूक लढतात परंतु या निवडणुकीत उदयनराजेच उदयनराजेंच्या विरोधात होते म्हणून उदयनराजेंनीच उदयनराजेंचा पराभव केला बस्स.!
उदयनराजे हरले उदयनराजेंकडूनच…
RELATED ARTICLES