सातारा: सातारा येथील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री जयश्री गुजर यांचे आज सकाळी खाजगी रूग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 83 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक जयवंत गुजर यांच्या त्या पत्नी होत.
जयश्री गुजर या अतिशय प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. सर्वजण आदराने त्यांना माई म्हणून संबोधत. पतीच्या सहवासामध्ये कथेच्या माध्यमातून लेखनीचा उत्कट आविष्कार त्यांनी 15 वर्षे जोपासला. अबोली, अनुराधा, माहेर यासारख्या नामांकित मासिकांच्या कथा स्पर्धेत त्यांनी पारितोषिके पटकावली होती. एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर त्यांनी लेखनी हातात धरली नाही. पण पतीतील पत्रकार हा त्यांनी एखाद्या रूग्णासारखा सांभाळला. सर्व कौटुंबिक बाजू खंबीरपणे सांभाळून पतीच्या लेखनातील जिवंतपणा त्यांनी देवपूजेसारखा सांभाळला. वार्धक्यात शारीरिक कटकटी व व्याधी न उगाळता अखेरपर्यंत आनंदी व समाधानी राहणे हीच त्यांची कुटुंबसुखाची कल्पना होती. अखेरच्या काळात प्रकृती खालावत असतानाही स्वत:ला सावरून घेणे हेही त्यांचे एक स्वभाववैशिष्ट्य होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पुरस्काराने तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते, प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
साहित्य, सामाजिक, उद्योग, पत्रकारिता क्षेत्रांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
जयवंत गुजर यांच्या पत्नी जयश्री गुजर यांचे निधन
RELATED ARTICLES