सातारा: गेली वीस वर्षांपासून सातारा शहरात पत्रकारितेच्या माध्यमातून पहिले पाऊल टाकणारे पत्रकार पांडुरंग पवार यांच्या अकाली निधनाने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नामांकित धावपटू म्हणून त्यांनी सातारा जिल्हयाच्या सीमा पार केल्या. काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तर दुसर्या बाजूला इलेक्ट्रॉनिक मीडिया व सातारा शहर पत्रकार संघाच्या वतीने शेंद्र येथील एहसास मतिमंद मुलांच्या शाळेत पत्रकार पांडुरंग पवार यांच्या आठवणी मतीमंद मुलांसाठी गोड घास ठरला आहे.
सातारा शहरापासून नजिक असलेल्या धावडशी गावचे सुपूत्र पांडुरंग पवार यांचे सहा महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याचे काम केले. पत्रकार पवार यांच्या पश्चात त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. आणि पत्रकार सहकारी मित्रांनी मानवतेच्या भावनेतून हा वाढदिवस साजरा करून मतीमंद मुलांच्या चेहर्यावर हास्य फुलविले.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या आंदोलनात अनेकदा पवार यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्रकार सरक्षण कायद्याच्या मसूद्यावर सही केली होती. हा कायदा पाहण्यासाठी पत्रकार पवार हे नसले तरी त्यांच्या आठवणी सर्वांच्याच स्मरणात राहणार आहेत.
आज सकाळी शेंद्रे (ता.सातारा) येथील महामार्गानजिक एहसास मतिमंद मुलांच्या शाळेत गोड घास भरविण्याचा विधायक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दिपक प्रभावळकर, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे राहुल तपासे, संतोष शिंदे, निखील मोरे, ओंकार कदम, तुषार तपासे, सचिन नलावडे, प्रतिक भद्रे, प्रशांत जगताप, रामा पवार व इतर पत्रकारांनी या शाळेतील मुलांना गोड जेवण दिले. तसेच पत्रकारांनी पाडुरंग पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेचे संस्थापक संजय कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
दिवंगत पत्रकार पांडुरंग पवार यांच्या आठवणी झाल्या मतिमंद मुलांसाठी गोड घास
RELATED ARTICLES