सातारा : लोकसभा निवडणूक-2019 ची आदर्श आचारसंहिता 10 मार्च पासून सुरु झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, तहसीलदार वैशाली राजमाने, जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नामनिर्देशनपत्र जर ऑनलाईन भरले तर चुका होणार नाहीत उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरण्यावर भर द्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, राजकीय पक्षांना प्रचारासाठी विविध परवाने घ्यावे लागतात यासाठी एक खिडकी योजना जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांनी वेळोवेळी हिशोब देणे बंधनकारक आहे. राजकीय पक्षांना प्रचार साहित्य प्रसारणासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. असे प्रमाणपत्र नसल्यास प्रचारास बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयागाने सुरु करण्यात येणार्या सुविधा पची माहितीही यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी विविध पक्षांच्या पदाधिकार्यांना दिली.
सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES