Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीउदयनराजे व्हर्सेस विक्रम पावसकर: नेमकं काय बिघडलं?

उदयनराजे व्हर्सेस विक्रम पावसकर: नेमकं काय बिघडलं?

सातारा: निकालानंतर पराभवाचे खापर कोणावरही फोडणे शक्य असते. पण लोक ते मान्य करतील अशी शक्यता कमी असते. निवडणूक लढवण्यासाठी जिंकण्याच्या शर्यतीत असणारा प्रत्येक उमेदवार त्याचा होमवर्क पन्नासावेळा तपासून काम करीत असतो. कुठेही कसल्याही त्रुटी राहू नयेत याची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असते. यासाठी पुरेसा वेळ, पुरेसा पैसा आणि थिंक टँक यावर बरेचसे गणित अवलंबून असते. खुषमस्करे आणि हुरडंफुक्यांना किती किंमत द्यायची, मतदारसंघात सध्याची फॅक्ट काय आहे, धोके काय आहेत, त्यांची सोडवणूक कशी करायची यासाठीचा आराखडा उमेदवाराने मनात आणि कागदावर करायचा असतो. देशात आजघडीला यांचे नियोजन करण्यात भारतीय जनता पक्ष इतरांपेक्षा आघाडीवर आहे. आज महाराष्ट्रात सरकार येत नाही हे लक्षात यायला उशीर झाल्यावर त्यांनी पुढची तयारीही सुरू केली. अजूनही सरकार स्थापनेची आशा त्यांनी सोडून दिलेली नाही. आमदार फुटीच्या भीतीपेक्षा त्यांची केंद्रातील ईडी वगैरे यंत्रणांवर जास्त भिस्त आहे. भविष्यातील शक्याशक्यता ध्यानात घेऊन भाजप थिंक टँक हे काम करीत असतो. झालेल्या चुका का झाल्या, त्याचे निरसन कसे करता येईल याचे गणित भाजपच्या या थिंक टँकमध्ये अविरत सुरू असते. निवडणूक असली आणि नसली तरी. राष्ट्रवादी व काँग्रेस त्या मानाने अशिक्षित म्हणता येतील.
पराभव झाला म्हणून कोणावर खापर फोडण्यापेक्षा आत्मचिंतन महत्त्वाचे असते. एवढे सगळे सांगितल्यानंतर माझा रोख नेमका कोणाकडे आहे हे आपल्या लक्षात आले असेल. उदयनराजे भोसले यांनी विक्रम पावसकरांना खाली खेचा आणि ठेचा असे उद्गार कराडच्या मुस्लिम मेळाव्यात काढले. याचे पडसाद लगेच कराडच्या सोशल मीडियात उमटले. आम्ही भाकरीबरोबर ठेचा खातो. कराडचे राजकारण कळले नाही, जिल्ह्याचं काय घेऊन बसला? अशा पोस्ट पडल्या.
कराडचे राजाभाऊ देशपांडे, अण्णासाहेब पवार वाहगावकर यांनी पहिल्यांदा सातारा जिल्ह्यात कमळ आणले. दोघांनीही कमळाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. त्यावेळी भाजपची ताकद क्षीण होती. भविष्यात सत्ता येण्याची तीळमात्र शाश्वती नसल्याने भाजपमध्ये सामसूम होती. त्यामानाने सातारा जिल्ह्यात शिवसेनेने चांगली आघाडी घेतली होती व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारावला होता. जावलीतून सदाशिव सपकाळ आमदार झाले तर हिंदूराव निंबाळकर जुन्या सातार्‍यातून खासदार झाले. नंतर भाजपचा एकमेव आमदार डॉक्टर दिलिप येळगावकर हे सातारा जिल्ह्यातून निवडून आले. सपकाळ, निंबाळकर हे व्यक्ती म्हणून नव्हे तर पक्ष म्हणून व बदल हवा म्हणून निवडून आले. या उलट डॉक्टर येळगावकर हे पक्ष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून निवडून आले. (पान 1 वरून) पण त्यावेळीही भाजप जिल्ह्यात नावालाच होती. उदयनराजे एकदा भाजपचे आमदार म्हणून निवडून आले हा अपवाद होता. त्याआधी भाजपचे जिल्हाध्यक्ष कोण? या प्रश्नापेक्षा जिल्ह्यात भाजप आहे का? असा प्रश्न विचारला जात होता. उदयनराजेमुळे भाजपचे जिल्हाध्यक्षपद परळी खोरेतल्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडे म्हणजेच भिकुभाऊ भोसले यांच्याकडे गेले. तिथून भाजपला जिल्हाध्यक्ष असतो हे जनतेला माहित झाले. नंतर उदयनराजेनी भाजपला रामराम ठोकला मात्र भिकुभाऊनी आपले पद लवकर सोडले नाही. त्यानंतर पाटणचे भरत पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष झाले. शिवसेनेला वार्‍यावर सोडून 2014 ला अत्यंत गुर्मीत असणार्‍या भाजपने सरकार स्थापन केले. शरद पवारांनी त्यावेळी टाकलेल्या गुगलीने नाईलाजाने फरपटत शिवसेनेला भाजप सरकारमध्ये जाणे भाग पडले. चंद्रकांत पाटील सारख्या विधानपरिषद आमदारांकडे ढीगभर खात्यांचा कारभार सोपवला गेला. पण शिवसेनेला दिलेले तुकडे चघळण्यावाचून इलाज राहिला नाही. त्याचा वसूल अर्थातच आता निघतोय .
सांगायची गोष्ट ही की, भाजप राज्यामध्ये सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीला उतरती कळा लागली तर अस्पृश्य समजल्या जाणार्‍या भाजपात प्रवेशाची रांग लागली. याची सुरुवात माणच्या अनिल देसाईंनी केली. त्यांनी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर समाधान मानले. पुढे काय झाले सर्वांना माहीत आहे. विक्रम पावसकर यांनी त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यावर केंद्र व राज्यातील सत्तेमुळे हे पद पालक मंत्र्यांसारखे झाले. काँग्रेस व भाजप हे केंद्रातील दोनच मुख्य पक्ष असे आहेत की ते पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना आमदारकीपेक्षा मानाचे स्थान देतात. पावसकर जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर भाजपकडे बेरीज सुरू झाली. त्यांची पार्श्वभूमी सांगायची तर वडील विनायक पावसकर हे कट्टर हिंदुत्ववादी. त्यांनी कराडात नगरसेवकपद भुषवले आहे. हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांचे संघटन केले. ज्यावेळी कराडात भाजपला कोणतीही संधी नव्हती त्यावेळी विक्रम पावसकर यांनी नेतृत्व करून पक्षाला उभारी आणली. यामध्ये आधी त्यांना कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले, उत्तरमध्ये मनोज घोरपडे, माण खटावात डॉक्टर येळगावकर, अनिल देसाई तर अलीकडे मदन भोसले जयकुमार गोरे, साता़र्‍याचे दोन्ही राजे यांची मदत झाली पण गेली पाच वर्षे पावसकर यांनी सत्ता किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून केलेले संघटन याबद्दल दुमत असणार नाही. पक्षाने टाकलेली जबाबदारी त्यांनी त्यांच्यापरीने निभावली हे मान्य करावे लागेल. भाजपचे कार्यकर्ते हे गेल्या पाच सहा वर्षांपासून एकच ध्येय समोर ठेवून काम करीत असताना सत्तेत पुढे हाच पक्ष असणार हा अंदाज बांधून संधीसाधुंनी भाजप प्रवेश केला. त्यात शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश होता. नंतर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांच्याकडे द्यायचे शरद पवार यांनी ठरवले. सातार्‍यात सर्किट हाऊसला बैठकही झाली. आधी राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे नेतृत्व रामराजे निंबाळकर यांच्याकडे होते.उदयनराजे व रामराजेंचे विळ्या भोपळ्याचे सख्य. शिवेंद्रराजे भाजपमध्ये. मग आपण काय करायचे हा आभाळाएवढा प्रश्न उदयनराजेंना पडला. मग त्यांनी भाजप प्रवेश केला. हा प्रवेश करण्याआधी राष्ट्रवादीला मान्य नसणारी भिडे गुरुजींची विचारसरणी पक्षाने थोपवून धरली होती. आता त्याच विचारसरणीच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला. या पक्षाचा कट्टर हिंदुत्ववाद त्यांना मान्य आहे की तो लवचिक आहे? हे करावे का ते? असा सगळा वैचारिक गोंधळ झाला. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे काहींना ताकद मिळाली. काहीजण गळाठले. त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याने आणि नंतर आमदारकी बरोबर जाहीर झालेल्या निवडणुकीने अनेकांना गर्भगळीत केले. काही निवडणुकांची गणिते बदलली. अपवाद फक्त शिवेंद्रराजे, महेश शिंदे यांचा शिवेंद्रराजेंना आपली ताकद दुप्पट वाढणार याचा अंदाज होता तर महेश शिंदेंना काहीही न करता आमदार होऊ शकतो याची जाणीव झाली. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाचा आपल्यालाही फायदा होईल अशी आशा कराड दक्षिणमध्ये अतुल भोसलेंना होती. पण राजकारणातील सोंगट्या कधी कोणावर कसा परिणाम घडवतील हे कुणाला सांगता येणार नाही. मी मागे म्हटल्याप्रमाणे उदयनराजेंच्या खासदारकीचा राजीनामा नंतर निवडणूक लढवणे इथपर्यंत अतुल भोसलेंचे ठीक होते. मात्र श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच भोसलेंचे गणित बिघडले .
कराड दक्षिणच्या सांगता सभेत पावसाने जोरदार भडिमार केला.अतुल भोसले यांनी भर पावसात धुंवाधार भाषण केले. तत्पूर्वी पावसकरांनी आणि कराडच्या नगरसेवकांनी काय भाषणे केली याच्या खोलात जायची गरज नाही. बरेच वेळा ते वृत्तपत्रांमध्ये छापूनही आले आहे आणि मीही मांडले आहे.अर्थात त्याचा झालेला प्रतिकूल परिणाम उदयनराजेंच्या मतांपेक्षा अतुल भोसले यांच्या मतांवर जास्त झाला विक्रम पावसकर आपल्या भाषणात नेमके काय म्हणाले याचे उत्तर देताना ते त्यांच्या पक्षाच्या किंवा आंदोलनाच्या विचारसरणीनुसार योग्यच बोलले. फक्त जागा, काळ आणि वेळ चुकीची होती. निवडणूक नसती तर त्यांचे भाषण हिंदू किंवा मुस्लिम समाजाने गांभीर्याने घेण्याचे कारणच नव्हते ते घेतलेही नसते. पण अतुल भोसले यांचे मुख्य विरोधक पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठे भांडवल केले. त्याचा लाभ त्यांना निवडणुकीत मिळाला. इथं उदयनराजेंचा विषयच येत नाही. त्यामुळे त्यांनी कराडात येऊन मुस्लिम समाजाचा मेळावा घेऊन माफी मागणे वगैरे प्रकार करायला लोक अडाणी राहिले नाहीत.
उदयनराजे भाजपमध्ये आल्यावर पाच वर्षे पक्षासाठी खस्ता खाणार्‍यांना वाईट वाटणे साहजिकच होते. नांगरट, कुळवणी, पेरणी करायची आम्ही आणि कणसं खुडायला तुम्ही हे कुणालाच पटण्यासारखं नव्हतं. निदान ज्यांनी मेहनत घेतली त्यांना तर मुळीच पटणार नाही . उदयनराजेंच्या वलयात आपल्याला किंमत राहणार नाही हे भाजपच्या सगळ्या निष्ठावंतांना ठाऊक होते . त्यांचा पराभव का झाला हे मी मागे फेसबुकवर मांडले आहे. त्याची पुनरुक्ती करण्याची गरज नाही .
पक्ष प्रवेश करतानाच पक्षाची तत्त्वे, अटी, नियम तोंडी मान्य असल्याचे समजले जाते. कराड, सातारा, वाईमध्ये मुस्लिम समाजाचे मेळावे घेऊन पॅचअप करण्याचा उदयनराजेंचा उपक्रम स्तुत्य आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने दुरावलेल्या मुस्लिम किंवा दलित समाजातील सौहार्दाचे पॅचअप भाजपमध्ये राहून होईल का हा खरा प्रश्न आहे पावसकरांचा प्रभाव कराड तालुक्यात जास्त असला तरी जिल्ह्याच्या इतर भागातही पक्ष किंवा स्वतःच्या माध्यमातून त्यानी संपर्क वाढवला आहे. अशा वेळी त्यांच्यावर पराभवाचे खापर फोडून महाराजांनी नक्की काय साधले हा संशोधनाचा विषय आहे. माफी मागून किंवा इतरांना दोष देऊन त्यांचे स्वतःचे समाधान होऊ शकेल पण आऊटपूट मिळणार नाही.
भाजप हा संधिसाधू पक्ष आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी हे सुतळाक आहेत अशातला भाग नाही. सत्तेसाठी पक्षाला कोणाची जास्त मदत होईल यावर ते गणित बांधत असतात. पूर्वी भाजपमध्ये निष्ठावंतांना किंमत होती. आता ती सगळी तत्वे बासनात बांधली गेली आहेत. तसा जर हा तत्त्ववादी पक्ष असता तर सातार्‍यात पाच वर्षे धडपडणार्‍या दीपक पवारांना डावलून ऐनवेळी आलेल्या शिवेंद्रराजेंना उमेदवारी दिली नसती. मात्र पक्षाचा एक आमदार वाढवणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. माण खटावात डॉक्टर येळगावकर, अनिल देसाई यांनी पक्ष वाढवला. पण बदनाम आमदार पक्षश्रेष्ठींना जवळचा वाटला. ही या पक्षाची तत्त्वे. साधनशुचितेच्या गप्पा मारणारा हा पक्षही तिथेच बदनाम झाला.
राष्ट्रवादीची सातार्‍यातील पोकळी शरद पवारांनी भरून काढली. उद्या उदयनराजेंचे ऐकून पक्षवाढीसाठी रात्रं दिवस काम करणार्‍या पावसकरांना डावलले तर कार्यकर्त्यांना काय संदेश जाईल? याचा विचार सत्तापिपासू भाजपकडून होईल का हा खरा प्रश्न आहे. उदयनराजेंनी आत्तापर्यंत ते ज्या पक्षात गेले तिथे सर्वांना वाकवले. भाजप सुरवासुरुवातीला ते खपवून घेईल. नंतर नाही .पुन्हा त्यांनी आपल्या अवास्तव मागण्या पक्षाकडे रेटल्या तर पक्षाची अडचण होणार हे नक्की . त्यावेळी हे पक्षाचे निष्ठावंत पक्षाबरोबर नसणार, ते शिवसेनेचा पर्याय निवडतील. पण उदयनराजेंचे पक्षांतर झाले तर भाजपला येथे कार्यकर्ता असणार नाही आणि नवीन कार्यकर्ते घडवणे शक्य होणार नाही. मग पुन्हा निर्माण झालेली पोकळी कशी भरुन निघणार?
राष्ट्रवादीत असताना उदयनराजेंकडून होणारी कामे किंवा चुका यांची जबाबदारी शरद पवार हे वडिलांप्रमाणे घेत होते. उदयनराजेंनी कितीही सांगुद्यात की खंडणी प्रकरणात माझ्याकडे दुर्लक्ष झाले, पण शरद पवार हे त्यांच्या पाठीशी ठामपणे होते हे सत्य आहे. त्यांनी केलेल्या चुकांवर पवारांनी नेहमीच पांघरून घातले. मात्र पक्षाला गळती लागली असताना त्यांची साथ सोडणे उदयनराजेंना महागात पडले. पराभवाचे खापर पावसकरांवर फोडून मुस्लिम समाजाची माफी मागणे यामुळे मलिन झालेली प्रतिमा सुधारायला उदयनराजेंना वेळ लागला. ज्याप्रमाणे काही ब्राम्हण समाज उमेदवार हा ब्राह्मण असावा, कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल, नसला तर तो किमान भाजपचा असावा अशी अपेक्षा करतात तसेच काही मुस्लिम समाज हा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी तो किमान भाजपचा नसावा अशी अपेक्षा व्यक्त करतात. अतुल भोसले यांना मुस्लिम मतदारांचा पाठिंबा भाजप म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून होता. सांगता सभेत पावसकरांचे किंवा इतरांची झालेली भाषणे हे उदयनराजेंच्या पराभवाचे कारण होऊच शकत नाही. अतुल भोसले यांच्या पराभवाचे ते कारण होऊ शकते. विक्रम पावसकर हे गेली पाच सहा वर्षे भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत.
उदयनराजे हे आयत्या वेळी भाजपात आले. कराडात त्यांचे लागेबांधे चार नगरसेवकांपलीकडे नाहीत. त्यांना कुरवाळण्यापलीकडे त्यांनी इतर कोणाशीही संधान बांधले नाही, त्यांना तशी गरजही वाटली नाही. पावसकर हे कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत हे उदयनराजेंना निवडणुकी आधी माहित होते. आपण ज्या पक्षात प्रवेश करतो त्या भाजपची विचारसरणी ही हिंदुत्ववादी आहे हेही त्यांना माहीत होते.
पक्षात प्रवेश करताना त्या पक्षाची सर्व तत्त्वे विचारसरणी आपल्याला मान्य आहे, अशा अटी शर्ती नावाचा फॉर्म न भरता अलिखित पणे तो मान्य करावा लागतो. राष्ट्रवादीत या अटी शर्ती नियम खास उदयन राजे यांच्यासाठी शिथिल होत्या आणि उदयनराजेही ते कोलत होते.
(उर्वरित भाग उद्याच्या अंकात)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular