सातारा (डॅनियल खुडे) : महाराष्ट्रातील शनिवारची सकाळ अनेकांना झोपेतूनच धक्का देवून उठवत होती. फडणवीस मुख्यमंत्र्यांची तर चक्क अजित पवार यांनी हनुमान उडी मारली. उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेताना हे पाहताना अनेकांना स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. काय खरं… काय खोटं हे पडताळण्यासाठी कोण मोबाईल तपासत होतं…. कोण टीव्हीच्या बातम्या पाहत होतं तर कोण इंटरनेटवर होतं. हा धक्का पचवण्याच्या आतच दस्तुरखुद्द शरद पवार व उध्दव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली तेथे पवारांनी आम्ही शिवसेनेबरोबर आहोत. अजित पवारांनी विश्वासघात केलाय, ते असे पक्षातून फुटतील असे वाटले नव्हते असे सांगून आणखीनच संभ्रम वाढवला. त्यामुळे काका-पुतण्याच्या भांडणात खरं काय अन् खोटं काय? हे अनेकांना न उलगडणारं कोडं आहे. परंतु या कोड्यावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा केलेला हा प्रयत्न….
दि. 24 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल अनपेक्षित होता. जिथं भाजपला दोनशे पेक्षा अधिक जागा मिळतील असे वाटत होते तेथे त्यांना 105 वर समाधान मानावे लागले होते. तर सेनेनेही 56 जागांवर यश मिळवले होते. त्यामुळे सेना-भाजप युतील स्पष्ट बहुमत मिळालं असल्याचं दिसत होतं परंतु मागील पाच वर्षाच्या काळात सेना-भाजपच्या संसारात भाजपने सेनेलाच दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पाच वर्षात सेना-भाजप सोबत राहिल्यास भाजपने सेना संपवण्याचा ऐनकेन प्रकारे प्रयत्न केला असता त्यापेक्षा मिळालेल्या संधीचा फायदा घेत चाणाक्षपणे उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी भाजपला कोंडीत पकडत मुख्यमंत्री अडीच वर्ष व सत्तेत पन्नास टक्के वाटा मागितला कारण भाजपला त्याशिवाय पर्याय नव्हता परंतु भाजपने प्रस्ताव धुडकावताच सेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसला जवळ करता महाशिवशाही आघाडीची घोषणा केली. बैठकांवर बैठका झाल्या. सरकार आज येतंय की उद्या या प्रतिक्षेत महाराष्ट्राची जनता होती. शेवटी शुक्रवारी रात्री महाशिवशाही आघाडीच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे यांचे नाव शरद पवारांनी घोषित केले व येथेच नात्यांना छेद गेला.
अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बसताना मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे नको होते. त्यामुळेच त्यांनी यापूर्वी दोन-तीन वेळेस बैठकीतून वॉकआऊट गेले होते. परंतु काहीही केल्या काका उध्दवलाच सपोर्ट करत असल्यामुळे अजित पवार नाराज होते. तसेच महिना होत आला तरी सत्तापेच प्रसंग काही केल्या सुटेना त्यामुळेही अजित पवार संभ्रमात होते. तर एकीकडे संजय राऊत रोज पत्रकार परिषदा घेत वेगवेगळे स्टेटमेंट करत होते. तर इकडे काँग्रेस-राष्ट्रवादी व सेना यांचं त्रिकुट जमवण्याचं अवघड काम शरद पवार हळूवारपणे पण पक्के करत होते.
ईडी मागे लागल्यापासून अस्वस्थ झालेले अजित पवार यांनी शरद पवारांवर ईडी लावताच आमदारपदाचा राजीनामा दिला. जलसिंचन घोटाळ्यासह अन्य घोटाळ्यात फक्त अजितदादा अडकले होते त्यामुळे आपण अडकलो तर आपला ही छगन भुजबळ होईल ही भिती त्यांना होती. त्यातच या सत्तापेच प्रसंगाचा फायदा घेत अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी काका-पुतण्याला सर्वातून सोडवतो असे आश्वासनही दिले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु शरद पवार हे कशातही न अडकल्याने त्यांनी त्यांच्या प्रस्तावाला कदाचित सहमती दर्शवली नसेल असे तात्पुरते आपण समजू परंतु पुरते गाळात अडकलेल्या अजित पवारांना ही नामी संधी वाटली असेल. ईडीतून मुक्तता व उपमुख्यमंत्रीपद ही मग काय फक्त आमदारच फोडायचेत… गटनेता ही आपणच आहोत. कायद्याची नस पकडत त्यांनी काही पक्के आमदारांसोबत घेवून 54 आमदारांच्या सह्यांचे पत्र शरद पवारांना न सांगता राज्यपालांना देवून सकाळीच शपथविधी उरकून घेतला असावा.
यावर मुरब्बी ‘काका’ नी डाव टाकत उध्दव ठाकरेंसोबत पत्रकार परिषद घेवून अजित पवारांना राष्ट्रवादीतून निलंबीत करत असल्याची घोषणा करणे अपेक्षित होते परंतु त्यांनी तसे केले नाही. पार्लमेंटरी बोर्डाची बैठक घेवून मग निलंबन करता येईल असे सांगितले. तसेच पक्षांतरबंदीचा कायदा आहे हे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगतानाचा जर कोणी हा कायदा मोडला तर राष्ट्रवादी, सेना व काँग्रेस एकत्र येवून त्या उमेदवाराला पाडेल असा नकळतपणे दमही दिला हे सर्व महाराष्ट्राने पाहिलाच त्यामुळे काका-पुतण्याची भांडणे किती खरी किती खोटी देवच जाणे !
सर्व सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न
* अजित पवार, शरद पवारांना न सांगता एवढे मोठे धाडस करु शकतील का?
* शरद पवार यांची अजित पवारांना आतून फुस असेल का?
* ईडीच्या भितीने कारावास टाळण्यासाठीच अजितदादाने हे पाऊल उचलले असेल का?
* राष्ट्रवादीत राहूनही अजितदादाच उपमुख्यमंत्री होणार होते मग हे बंद का?
* शरद पवारांना शिवसेनेच्या पाटीत खंजीर खुपसायचे आहे का?
* काका आपल्याला संपवतील या भितीनेच अजितदादाने हे धाडस केले का?
या सर्वांची उत्तरे दि. 30 रोजी विश्वास दर्शक ठरावावेळी मिळतीलच व तेव्हाच शरद पवारांचा खरा चेहराही महाराष्ट्राला कळेल. कारण विश्वासदर्शक ठराव हरला तर अजितदादांच्या सोबत शरद पवार नव्हते हे सिध्द होईल. परंतु विश्वासदर्शक ठराव अजित पवारांनी जिंकलाच तर शरद पवार हे विश्वासाला पात्र नाहीत या वाक्यावर कायमचाच शिक्का बसेल हे मात्र नक्की !
चौकट
गेले महिनाभरात सरकार स्थापनेबाबत संजय राऊत, शरद पवार, रामदास आठवले, सोनिया गांधी, उध्दव ठाकरे हीच नावे चर्चेत होती. नरेंद्र मोदी, अमित शहा, राज ठाकरे शांत होते. या सर्व घडामोडींमध्ये अजित पवार कोठेच नव्हते त्यामुळेच भाजपवाल्यांनी अजित पवारांवर जाळे टाकले की काय? अशीही शंका अनेकजण व्यक्त करीत आहेत.
काका-पुतण्या…. खरं काय? … खोटं काय?
RELATED ARTICLES