सातारा : भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री बनण्याचा अजितदादा पवार यांचा निर्णय राष्ट्रवादीच्या पचनी पडलेला नाही. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व तीन आमदारांनी सावध प्रतिक्रिया देत आम्ही पवार साहेबांसोबतच असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.
सातारा जिल्हा व अजितदादा पवार यांचे जुने नाते असून थोरल्या पवारांनंतर जिल्ह्यावर पक्की मांड असणारे अजितदादा दुसरे नेते आहेत. सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून काम पाहताना दादांनी आपला राजकीय दरारा कायम ठेवत कार्यकर्त्यांना सुद्धा बळ दिले. आमदार बाळासाहेब पाटील, अमित कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, गायत्री देवी पंतप्रतिनिधी, माजी आमदार प्रभाकर घार्गे, या सारख्या अनेक तगड्या समर्थकांची फौज त्यांनी उभी केल्याने राष्ट्रवादीतच अजितदादा व शरद पवार समर्थक असे दोन गट तयार झाले. मात्र वीस वर्षाच्या राष्ट्रवादीच्या वाटचालीत अजितदादांचे थोरल्या पवारांशी अनेकदा मतभेद झाले तरी पक्ष चौकट त्यांनी मोडली नव्हती. मात्र सत्ता स्थापनेच्या प्रयोगात अजितदादांनी भाजपबरोबर जाण्याच्या त्यांच्या निर्णयावर राज्यभर कुठे सावध तर कुठे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दादांच्या या निर्णयाने सातारा जिल्हा राष्ट्रवादी अचंबित झाली आहे. आमदार दीपक चव्हाण व आमदार बाळासाहेव पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तर मकरंद पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे ठामपणे सांगितले. जिल्हाध्यक्ष सुनील माने व दादा समर्थकांनी सध्या तरी सोयीस्कर मौन बाळगले आहे. शरद पवारांनी सातार्यातून जो राजकीय डाव टाकला त्याचे संपूर्ण राज्यात काय परिणाम झाले याची साक्षीदार जिल्हा राष्ट्रवादी आहे .पवारांनी पक्षांतर केलेल्या उदयनराजे भोसले यांचे असे काही उदाहरण तयार केले की सध्या तरी सातार्यातून अजितदादा पवार यांच्या हाकेला कोणाची ओ मिळेल अशी शक्यता नाही. थोरल्या पवारांनी राजकीय नाड्या आवळल्याने सैरभैर आमदार एका दोरीत सरळ शरद पवारांच्या कंपूत दाखल झाल्याच्या वेगवान घडामोडी मुंबईत घडत असताना सातार्यात मात्र प्रचंड राजकीय सन्नाटा होता .
सोमवारी कराडमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी व यशवंत कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शरद पवार जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दौर्यात पवार काय बोलणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा असणार. कराडमध्येच यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाजवळ अजितदादांनी मागे आत्मक्लेश आंदोलन केले होते. मात्र यंदा दादांनी राष्ट्रवादीची चौकट सोडून भाजप सोबत सत्तेत जाण्याचा मोठा निर्णय घेतला त्याच्यावर पवारांनी मुंबईत शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत दिले आहेत. राजकारणातील आगामी घडामोडी वेगवान असल्याने शरद पवारांचा कराड दौरा महत्वाचा ठरणार आहे.
अजितदादांबरोबर सातार्यातून कोण- कोण ? जिल्हा राष्ट्रवादीची सावध भूमिका, कराडात शरद पवार काय बोलणार?
RELATED ARTICLES