सातारा: महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाचे राज्य महाविकास आघाडीच्या माध्यमातून आले हे परिवर्तनाचे दृष्टीने सुचिन्ह आहे, असे मत तत्वज्ञान मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा.हिंदुराव पवार यांनी व्यक्त केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने परिवर्तनाचे दीपस्तंभ या विषयसुत्राने सुरु झालेल्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक धोरण या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य आण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे,कार्यवाह अॅड.हौसेराव धमाळ उपस्थित होते.
प्रा.हिंदुराव पवार म्हणाले, भारतात अनेक राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, सम्राट अशोक व अकबर हेच फक्त परिवर्तनाचा विचार पुढे नेणारे उपभोगशून्य खरे राजे होते .राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी दृष्टीकोण व सर्वंकश शैक्षणिक धोरणामुळे त्याच बरोबर म.फुले, कर्मवीर अण्णा यांच्या प्रयत्नामुळे मोठी शैक्षणिक क्रांती झाली व महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला आहे. शिक्षण हे सर्व सुधारणांची गुरुकिल्ली आहे हे समजून या समाज सुधारकांनी शैक्षणिक क्रांतीचे मोठे कार्य केले आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी मोफत व सक्तीचे शिक्षणाचा कायदा आपल्या राज्यात राबवला तसा कायदा अद्यापही केंद्र राज्य सरकारांना शिक्षण हक्काचा कायदा करूनही जमलेले नाही.
आधुनिक शिक्षण सम्राट, साखर सम्राटांनी समाज परिवर्तनाकडे पाठ फिरवली आहे. नवशिक्षित मध्यमवर्गीय समाज पालकवर्गआत्मकेंद्रित आणि खोट्या महत्त्वाकांक्षेने पछाडला आहे अशी खंत प्रा. पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रा. आण्णासाहेब होवाळे यांनी प्रस्ताविक केले. केशवराव कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रबोधनकारांच्या वारसाचे राज्य आले हे सुचिन्ह : प्रा. हिंदुराव पवार
RELATED ARTICLES