सातारा: मेघालयातील दुर्गम भागातील रिवाय या छोट्याशा गावात चाकोरीबाहेरचे शिक्षण देऊन नवी पिढी घडवण्यासाठीची एक शाळा सुरू करण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी निधी उभारण्यासाठी एक तरूण अवलिया सेतू हिमाचल अशी सायकल सफर करत आहे. ज्योतिष्को बिस्वास असं त्याचं नाव.जवळपास दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून तो बुधवारी सायंकाळी सातार्यात पोहोचला तेव्हा सातारकरांनी त्याचं उमदेपणानं स्वागत केलं.
ज्योतिष्को बिस्वास या 23 वर्षीय तरूणाचा जन्म पश्चिम बंगालमधील बेहरामपूरचा. दोन वर्षांनी त्याचं कुटुंब अरूणाचल प्रदेशात स्थलांतरित झालं. तेथील इटानगरमध्ये ज्योतिष्कोचं बालपण गेलं. तेथील पहाडी प्रदेशाशी तो एकरूप झाला. आता मेघालयातील रिवाय या सुमारे आठशे लोकवस्ती असलेल्या दुर्गम खेड्यात चाकोरीबाहेरचे शिक्षण देऊन नवी पिढी घडवण्यासाठी एक अनोखी शाळा सुरू करण्याचा त्यानं ध्यास घेतला. या शाळेत खेळ, पर्यावरण, योगा तसेच व्यवहारज्ञान शिकवले जाईल.
चांगले खेळाडू निर्माण करणे, पर्यावरणाला हानी पोहोचवणार्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया, चांगल्या आरोग्यासाठी व व्यक्तिमत्वासाठी योगविद्या शिकवणे यासाठी ही शाळा कार्य करेल. अशी अनोखी शाळा सुरू करण्याचे स्वप्न ज्योतिष्कोनं उराशी बाळगलं. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी देशभरातून निधी उभारायचं त्यानं ठरवलं.
कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत सायकलवरून सफर करत लोकांना या कामाची माहिती द्यायची असे ठरवून त्यानं हर्क्युलस कंपनीच्या सिंगल गिअर सायकलवरून 29 नोव्हेंबरला कन्याकुमारीपासून प्रवासाला सुरूवात केली आहे. दररोज साधारणत: 100 किलोमीटरचं अंतर कापत वाटेतील शहरांमध्ये जावून त्यासाठी तो जनजागृती करत आहे. त्याच्या या जिद्दीमुळे प्रभावित होऊन लोक तो देत असलेल्या लिंकवर मदत जमा करत आहेत.
यांना त्याच्या कार्याला हातभार लावावासा वाटतो त्यांनी www.ketto.org/contribute/contribute.php या लिंकवर मदत करावी असं आवाहन त्यानं केलं आहे. जवळपास दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून बुधवारी सायंकाळी ज्योतिष्कोचं सातारा शहरात आगमन झाल्यानंतर सातारकरांच्या वतीनं त्याचं उमदेपणानं स्वागत करण्यात आलं.
मोती चौकात डॉ.रवींद्र भारती – झुटिंग यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. गोलबागेजवळ प्रकाश टोपे व विजय मांडके यांच्या हस्ते सातारी कंदी पेढे व पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी गजानन चेणगे, गौतम भोसले, रंगकर्मी प्रकाश टोपे, सबनीस आढाव, रितेश काटेकर, बंडू भांडवले, महेश गुरव आदी उपस्थित होते.
कन्याकुमारीपासून निघालेल्या सायकलस्वाराचे सातार्यात स्वागत
RELATED ARTICLES