सातारा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जडणघडणीत व उत्कर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे थोर देशभक्त व स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची 40 वी पुण्यतिथी शुक्रवार दि.27 डिसेंबर रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे संपन्न झाली.
यावेळी बँकेचे जेष्ठ संचालक व महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, किसनवीर आबांनी स्वातंत्र्यापूर्वी अंगीकारलेले देश सेवेचे व्रत निस्वार्थीपणे पार पाडणेसाठी लोक प्रतिनिधीत्वाची पदे जबाबदारीने व यशस्वीरीत्या भूषवली. या कारकिर्दीत धोम धरण व सर्वदूर दुष्काळी भागात घेऊन जाणारे धोम कालवे, किसनवीर महाविद्यालय, किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि शेतकर्यांना समृद्धीकडे नेण्यास सज्ज असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा विविध संस्था सुरु करणेमागे आबांचा मोठा वाटा आहे.
बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने म्हणाले, सातारा जिल्हयाचे सर्वांगीण विकासासाठी, जिल्हयातील प्रत्येक तळागाळातील घटकांचा, सहकारी संस्थांचा, सहकार चळवळीचा तसेच औद्योगिक प्रगती होणेसाठी तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेत किसनवीर आबांचा मोठा वाट आहे.
संचालक प्रभाकर घार्गे म्हणाले, बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर.डी.पाटील, आणि आबासाहेब वीर इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभलेमुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. बँक ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्ह्यामध्ये 304 शाखा व 15 विस्तारित कक्षाच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या सेवा देत आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे म्हणाले, मा. आबासाहेब वीर यांची कारकीर्द सामाजिक बांधिलकीने परिपूर्ण, निस्वार्थी तत्वनिष्ठ आणि सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणारी होती. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या पण असामान्य कर्तुत्व सिद्ध केलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळातील संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर लोकहितदक्ष आणि द्रष्टे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी छाप उमटवली आहे.
याप्रसंगी ना.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक आ. बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, राजेश पाटील-वाठारकर, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, अर्जुनराव खाडे, प्रदीप विधाते, संचालिका सुरेखा पाटील, कांचन साळुंखे यांनी आबासाहेब वीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र आदरांजली वाहिली. तसेच उपस्थित बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे व आर.एम.भिलारे, व्यवस्थापक शामराव गायकवाड, विनायक कदम, नाना लंगुटे, सर्व विभागांचे उपव्यवस्थापक, अधिक्षक, सेवक यांनीही प्रतिमेस फुले वाहून आदरांजली वाहिली.
याचबरोबर बँकेच्या पोवई नाका, सातारा येथील यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र इमारतीचे प्रांगणातील आबासाहेब वीर यांचे पुतळयास हार घालून व फुले वाहून आदरांजली वाहिली.
जिल्हा बँकेत थोर स्वातंत्र्य सेनानी आबासाहेब वीर यांची पुण्यतिथी संपन्न
RELATED ARTICLES