सातारा : स्थानिक स्वराज्य संस्था या शहराच्या मातृसंस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातुन पायाभुत आणि मुलभुत सुविधा शहरवासियांना दिल्या जात असतात. या सुविधा मुबलक प्रमााणात नाही पण पुरेश्या प्रमाणात मिळतात का नाही,शहरातील वॉर्डमध्ये आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य दिले आहे का, अनावश्यक कामे करण्याचा घाट तर घातला नाही ना, असलेल्या सुविधांबाबत नागरीक समाधानी आहेत का या व अश्या समस्यांची माहीती घेण्यासाठी सर्व प्रथम सातारा नगरपरिषदेच्या प्रत्येक वॉर्डाला भेट देवून, नागरिकांशी हितगुज करण्याचे नियोजन आखले आहे.
याची सुरुवात लोकसभेचे दि.17 जुन पासून सुरु होणारे अधिवेशन दि.26 जुन रोजी संपल्यानंतर सातारा नगरपरिषदेमधुन केली जाणार आहे. अश्याच प्रकारचे वॉक इन वॉर्ड अॅन्ड टॉक विथ वॉर्ड हे अभियान जिल्हयातील सर्व नगरपरिषदांमध्ये राबविले जाणार असून, तालुक्याच्या ठिकाणी खास सभा घेवून ग्रामस्थांच्या समस्यांचा निपटारा करण्यात येणार आहे अशी माहीती सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातुन कार्यक्षम कारभार अपेक्षित आहे. नागरिकांकडून, कर रुपाने जमा होत असलेल्या प्रत्येक पै आणि पै चा विनियोग सुयोग्य कारणासाठीच झाला पाहीजे हे लोकशाहीमध्ये अपेक्षित असते. लोकांनी लोकांसाठी आणि लोकामार्फत चालवलेली संस्था म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था ओळखल्या जातात असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की,
आमचे राजकारणाची सुरुवात नगरसेवक पदा पासून झाली आहे, नगरपालिकांचा कारभार कसा चालतो हे आम्हाला चांगले ज्ञात आहे, नगरसेवकांची तळमळ वॉर्डाच्या सर्वांगिण विकासाकरीता असली पाहीजे, कुणाची तरी जिरवा जिरवी करण्यासाठी कोणतेही काम केले जावू नये अशी आमची धारणा आहे. जिल्हयातील प्रामुख्याने सातारा लोकसभा मतदार संघातील नगरपरिषदांमध्ये, नागरिकांना सुविधा मिळण्याबरोबरच, नागरिकांच्या असलेल्या समस्या आणि असलेल्या काही सार्वजनिक जबाबदार्या या सर्व बाबींची पहाणी वॉक इन वॉर्ड अॅन्ड टॉक विथ वॉर्ड या अभियानाव्दारे समक्ष आम्ही स्वतः करणार आहोत.
या अभियानाबरोबरच लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयाठिकाणी खास सभेचे आयोजन करुन, या सभेमध्ये ग्रामस्थांच्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याबाबतचा कालबध्द कार्यक्रम त्या त्यावेळी आगावू कळविणेत येईल असेही खासदार श्रीमंंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
तालुक्याच्या ठिकाणी खास सभा घेवून ग्रामस्थांच्या समस्यांचा निपटारा करण्यात येणार: खा.श्री.छ.उदयनराजे भोसले
RELATED ARTICLES