Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीभाजपा सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल : अनिल देसाई

भाजपा सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल : अनिल देसाई

सातारा : राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या माध्यमातून माणच्या पूर्व भागात टेंभू योजनेचे पिण्यासाठी पाणी आणण्यात यश आले आहे. आता उत्तर माणला जिहे – कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावच्या पाणी प्रश्नासाठी मी आणि डॉ. दिलीप येळगावकर यांचा पाठपुरावा सुरु आहे. या कामी सरकार सकारात्मक असून हा प्रश्नही लवकरच मिटेल, असा विश्वास भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप देसाई यांनी यावेळी केला.
देसाई म्हणाले, टेंभू योजनेतून माण – खटावला पाणी मिळावे, यासाठी 2003 सालापासून सलग 16 वर्षे माणच्या जनतेला बरोबर घेवून मोर्चे, आंदोलने करुन संघर्ष केला. डॉ. दिलीप येळगावकर यांनीही कित्येक वर्षे टेंभूमधून माण – खटावला पाणी मिळावे यासाठी संघर्ष केला. उच्च न्यायालयात याबाबत याचिकाही त्यांनी दाखल केली होती. आमच्या या लढ्याला राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून यश मिळायला सुरुवात झाली. टेंभूमधून आज माणच्या 16 गावांना पिण्यासाठी पाणी मिळाले असून महाबळेश्वरवाडी तलाव भरण्याचे काम सुरु आहे. लवकरच खटाव तालुक्यातील मायणी तलावही भरण्यात येणार आहे. वास्तविक टेंभूचे पाणी माण – खटावला मिळावे ही मागणी आम्ही 16 वर्षांपासून करत आहोत. या मागणीला यशही येत आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून आता ही मागणी नव्याने करुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देसाई यांनी केला. दि. 18 सप्टेंबर 2018 रोजी राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील माणच्या दौर्‍यावर आले होते. त्यांच्या हस्ते टेंभू योजनेचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. म्हसवड येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात मी आणि डॉ. दिलीप येळगावकर यांनी पिण्याचे पाणी दिल्याबद्दल आभार मानून आता शेतीसाठी टेंभू मधून पाणी द्या, उत्तर माणचा पाणीप्रश्न मार्गी लावा, अशी आग्रही मागणी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. याच कार्यक्रमात चंद्रकांतदादांनी टेंभूच्या अधिकार्‍यांना याबाबत प्राथमिक सर्व्हे करुन तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार टेंभू विभागाने तसा अहवालही ना. चंद्रकांतदादांकडे दिला होता. त्यानुसार खटाव तालुक्यातील 21 आणि माण तालुक्यातील 27 गावे, आटपाडी तालुक्यातील काही गावांना या योजनेमधून पाणी देता येवू शकते, असा अहवाल तयार केला आहे. या पाण्यासाठी आम्ही माण, खटावच्या जनतेला घेवून प्रसंगी जनआंदोलन पण केले आहे. या सगळ्या गावांना भाजपा सरकारच्या माध्यमातून लवकरच पाणी मिळणार आहे. दि. 14 ऑक्टोबर 2018 रोजी उत्तर माणच्या दौर्‍यावर ना. चंद्रकांत पाटील वडगाव व बिजवडी येथे आले असताना त्या भागातील वारुगड पासून कारखेलपर्यंत शेती पाण्याचा प्रश्न संपवण्यासाठी मी व लोकांनी मागणी केली होती. त्यावेळी जिहे -कटापूरच्या अधिकार्‍यांना ना. चंद्रकांतदादांनी प्राथमिक अहवाल सादर करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे आंधळी धरणातून या 32 गावांना पाणी उचलून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून देता येऊ शकेल, असा अहवाल जिहे -कटापूरच्या अधिकार्‍यांना केला आहे. त्याप्रमाणे त्याही भागांना पाणी मिळण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असल्याचे देसाई म्हणाले.
माण – खटावचा पाणी प्रश्न आघाडी सरकारच्या काळात तपाच पडून होता. त्यामुळे हे दोन्ही तालुके विकासापून वंचित राहिले. आता केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतक्या दिवसात त्यांनी या दोन्ही योजनांबद्दल कधी मागणी केली नाही. आत्ताही भाजपच्या सरकारकडेच ते हा प्रश्न मांडत आहे. भाजपच पाणी प्रश्न सोडवू शकते, याची जाणीव बहुदा त्यांना झाली असावी, असा टोलाही देसाई यांनी यावेळी लगावला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular