वडूज/धनंजय क्षीरसागर : विधानसभा निवडणूका होवून सुमारे दीड महिन्याचा कालावधी झाल्यानंतर कोणाच्या ध्यानी, मनी नसताना भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे सरकार सत्तेवर येत आहे. अचानकपणे झालेल्या या युतीचे वेगवेगळे पडसाद राज्यभर उमटणार आहेत. या निर्णयामुळे काहींना खुशी तर काहींना गम जानवणार आहे. असे असले तरी नव्या सरकारमुळे माण-खटावचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांची पाच वर्षे बल्ले बल्ले होणार असल्याची चर्चा आहे. तर काही अंशी प्रवाहापासून बाजूला असणार्या राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनाही अच्छे दिन येण्याची शक्यता राजकीय जाणकारांच्या गोटातून व्यक्त होत आहे.
गेली अनेक दिवस सरकार बनत नसल्यामुळे सरकारशी संबंधीत व्यवहार असणारे अनेकजण गॅसवर होते. त्यातच सत्तेच्या ऊबीकरीता शेती पाण्याचे निमित्त साधत आ. गोरे यांनी राष्ट्रीय काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मात्र गेली काही दिवस भाजपाला सोडून दोन्ही काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेची सत्ता येण्याची चर्चा होती. या चर्चेमुळे आ. गोरे यांच्या निष्ठावंत समर्थकांबरोबर गावोगावची क्रियाशील भाजपाई ही चिंतेत होती. आता भाजपाचे सरकार येणार असल्याने या मंडळींच्या आनंदाला पारावार उरले नाही.
दुसर्या बाजूला भाजपाला बाजूला ठेवून राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनले असते तर आ. गोरे अॅटोेमेटीक सरकारपासून बाजूला जावू शकतात. या आनंदात दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच निवडणूकीत भाजपा पासून बाजूला झालेले पदाधिकारी होते. मात्र आता फासे उलटे पडले आहेत.
भाजपाला पाठींबा देण्यासंदर्भात अजितदादा व थोरल्या पवार साहेबांच्या मध्ये मतभेद आहेत ? की दोघांनी मिच्युअल अंडरस्टँडींगने निर्णय घेतला हे येणारा काळ ठरवणार आहे. यदाकदाचित दोघांच्यामध्ये खरेच दरी निर्माण झाली तर खटाव-माणमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे माजी आमदार प्रभाकर घार्गे, विधानसभा निवडणूकीतील उमेदवार व कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख हे दोघे व त्यांचे समर्थकांचा ओढा शरद पवारांच्याकडे राहू शकतो. तर अजितदादांच्या खास समर्थक गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची पॉवर नव्या सरकारमुळे पुन्हा एकदा वाढू शकते.
डॉ. येळगांवकर, देसाईंना मैत्री धर्मावर अवलंब
मंत्रालय स्तरावर सर्वसामान्यांची कामे करण्याबाबत माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकरांचा हातखंडा आहे. गेल्या साडेचार वर्षात ते भाजपा सरकारच्या माध्यमातून राजरोसपणे छोटे-मोठे कामे करत होते. तर पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाईंनी मराठा तितुका मेळवावा.
या न्यायाने माजी महसूलमंत्री चंद्रकांत दादांशी लगट केली होती. मात्र या दोघांनी विधानसभा निवडणूकीस पक्षाच्या उमेदवारा विरोधात काम केले होते. त्यामुळे दोघांनाही सरकार दरबारी पुढच्या दाराने राजरोसपणे कामे करता येणे कितपत शक्य आहे. असा प्रश्न जाणकारांना सतावतो. अश्या परस्थितीत देसाई यांच्या कामी सातारचे आमदार व संभाव्य मंत्रीमंडळातील मंत्री असणार्या शिवेंद्रबाबांचा दोस्ताना कामी येवू शकतो.
तर डॉ. येळगांवकरांनाही भाजपातील मंत्री गणाची अनेक वर्षाची मैत्रीच उपयोगी पडू शकते. असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.
सर्वसामान्यांना दिलासा
देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक सरकारे आली. बहुतांशी वेळा सरकारच्या नेमका विरोधातील लोकप्रतिनिधी खटाव-माण मधून निवडून येण्याची परंपरा आहे. आता चुकून सरकार धार्जीने लोकप्रतिनिधी निवडून आले होते. अश्या परस्थितीतही भाजपाला बाजूला ठेवून सरकार येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनता अस्वस्थ झाली होती. आता मात्र केंद्र शासन, राज्य शासन व लोकप्रतिनिधी यांची दिशा एकच राहणार आहे. त्यामुळे पुढील निवडणूकीत शेती-पाणी, रस्त्याचे प्रश्न उरणार नाहीत. अशी चर्चा सामान्य जनतेमध्ये आहे.
माणदेशात जयाभाऊचे बल्ले बल्ले : गायत्रीदेवींनाही येणार अच्छे दिन
RELATED ARTICLES

