वडूज: महाराष्ट्रासह संपुर्ण देशभरात अनेक रथी-महारथी घडले. अश्या सत्पुरुषांच्या जडण-घडणीमध्ये आई-वडिलांची प्रेरणा व संस्कार ही दोन मुख्य प्रमुख कारणे आहेत असे मत युवक मित्र बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केले.
निमसोड येथे हरणाई सुतगिरणीचे संस्थापक कै. धैर्यशिल देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अंभेरी येथील शिवधाम आश्रमाचे संस्थापक प.पू.शिवानंद भारती यांच्यासह खटाव-माण तालुक्यातील प्रमुख राजकीय पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
कराडकर म्हणाले, रामायण, महाभारत यांच्यापासून स्वराज्याचा इतिहास या प्रत्येक ठिकाणी अनेक सत्पुरुष घडले आहेत. त्यांना लहानपनी आईकडून चांगले संस्कार मिळाले. तर वडिलांच्याकडून समाजामध्ये ताट मानेने उभे राहण्याची प्रेरणा मिळाली. अलिकडच्या काळात स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण भौतिक सुखासाठी धावत आहे. या गडबडीत लहान मुलावर चांगले संस्कार करण्याचा विसर पडत चालला आहे. तरुण मुले, मुली बिघडण्यामागे समाजमाध्यमांचा दोष आहे. मात्र संस्कार करण्यामध्ये आई-वडिलही कमी पडत असतात. रणजितसिंह देशमुखांना वडिलांच्याकडून मोठे त्यागाचे संस्कार मिळाले. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी वयात मोठमोठे उद्योग, व्यवसाय उभारले. या माध्यमातून दुष्काळी तालुक्यातील गोरगरीबांचे कल्याण व्हावे.
यावेळी शिवानंद भारती यांनीही भाषणात कै. धैर्यशिल देशमुखांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास मा.आ.प्रभाकर घार्गे, अनिलभाऊ देसाई, दादासाहेब गोडसे, डॉ. संदिप पोळ, संदिप मांडवे, अशोकराव गोडसे, प्रा. अर्जुनराव खाडे, सी. एम. पाटील, डॉ. विवेक देशमुख, भाउसाहेब वाघ आदिंसह गावोगावचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ह.भ.प. विजय शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. रणजीत देशमुख यांनी आभार मानले.
‘आई-वडिलांच्या प्रेरणेमुळेच सत्पुरुषांची जडण-घडण’
RELATED ARTICLES