वाई ः सर्वांगीण सुधारणावादी असलेले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आधुनिक युगाचे सुवर्णमध्य आहेत. त्यांच्या नावाचा पुरस्कार हा परिसस्पर्श आहे. असे भावपूर्ण उद्गार इतिहासाचे गाढे अभ्यासक व इतिहास संशोधक डॉ. राजा दिक्षित (श्रीधर मधूकर दिक्षित) पुणे यांनी आपल्या सत्कारास उत्तर देताना काढले.
येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा 23 वा महर्षी विठठल रामजी शिंदे पुरस्कार डॉ. दिक्षित यांना डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबा आढाव होते.
यावेळी व्यासपिठावर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिलाताई अढाव, मिनल दिक्षीत, सतीश भावसार, स्मिता भावसार, सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. दिक्षित पुढे म्हणाले, स्वातंत्र्य लढयाचा इतिहास शिकविताना समतेच्या लढयाचा इतिहासही शिकवावा. इतिहास म्हणजे आत्मशोध व आत्मबोध. इतिहास हा अतिसंवेदनशिलतेचा विषय होत आहे. त्याची चिंता वाटते. त्याला सांस्कृतिक दहशतवाद्यांनी वेढा घातला आहे. त्यातून इतिहासाला मुक्त करा. इतिहास माणसाला आशावादी बनवितो. इतिहास आणि हुकुमशाही यांचे गमतीशिर नाते आहे. हुकुमशाही इतिहासाला खात नाही तर इतिहासच हुकुमशाहीला खाऊन टाकतो. सर्वप्रकारची प्रतिभा हल्ली धोक्यात आली आहे. तीला वाचवावे लागेल. मुल्यात्मक, निकोप व अखंड क्रियाशिलतेने व विवेकाने ऐतिहासीक साक्षरता इतिहासकारांनीच निर्माण करावी.
संपादक सतीश भावसार म्हणाले, बाबुराळ अर्नाळकर यांच्यामुळे मी वाचनाला सुरूवात केली. बाबुराव अर्नाळकर ही वाचकांची अंकलीपी आहे. सगळे रस समाजाला आवश्यक आहेत.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, राजकिय इतिहास शिकविणे सोपे आहे. पण सामाजिक इतिहास शिकविणे फार अवघड आहे. कारण या विषयावर फार साहित्य उपलब्ध नाही. रा. ना. चव्हाण यांनी ही उणीव भरून काढली. म्हणून त्यांच्या साहित्याचे मोल मोठे आहे. कुटुंबाचा इतिहास हा सामाजिक इतिहास होवू शकतो. पण त्या लेखणातही चिकाटी हवी. सतीश कुलकर्णी म्हणाले, उंडाळे येथील समाजप्रबोधन साहित्य संम्मेलन, सातार्याकचे संबोधी प्रतिष्ठान व वाईचे रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान ही सातारा जिल्हयातील समाजप्रबोधनाची तीर्थक्षेत्रे आहेत. प्रबोधनाचे वर्णन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एका शब्दात केले आहे. ते म्हणतात प्रबोधन म्हणजे जागृती. रा. ना. चव्हाण यांनी महाराष्ट्रात जागृती निर्माण केली. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. बाबा आढाव म्हणाले, विचारमंथन सतत उमलत असावे. नवा भारत संविधानाच्या आधारे निर्माण करायचा आहे. त्याचे कायम भान असावे. सन्मानाने राहू द्या पण कष्टाने जगणेही आता अवघड होत आहे. निरंजण फरांदे यांनी सुत्रसंचालन केले. शरद चव्हाण यांनी आभार मानले. समारंभास प्रतासिंह देशमुख, आनंदराव शिंदे, एन. जी. गायकवाड, शामराव कर्णे, आनंदराव लोळे, सुनिल शिंदे, रविंद्र घोडराज, सुर्यकांत आंबेकर, शांताराम शिंदे, अनिल जोशी, अशोक नायकवडी, अरुण आदलिंगे, लक्ष्मिकांत रांजणे, सुमंत सकटे, प्रिती गोखले, प्राचार्य एस. बी. पाटील, आनंदराव जाधव, रामचंद्र लोखंडे, प्रा. संभाजीराव जाधव, वसंतराव ढेकाणे, कृष्णराव पवार, यशवंत सपकाळ, रावसाहेब पवार, अविनाश जोशी, दादा ताटके, शिवाजीराव राऊत, भाऊसाहेब शेवते, हणमंतराव दुधाणे, चंद्रकांत मापारी, प्रा. चंद्रकांत कांबळे, प्रा. रामचंद्र यादव, आयेशा सय्यद, सुनंदा कांबळे, पार्वती शिंदे, सुनिता विरकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आधुनिक युगाचे सुवर्णमध्य आहेत: डॉ.राजा दीक्षित
RELATED ARTICLES

