पाचगणीकडे जाणार्या भाजीच्या गाड्या कचरा खाली करतायत घाटातच
वाई : काही दिवसांपूर्वी वनविभागाने पसरणी घाटात कचरा टाकणार्या गाड्यांवर कारवाई करून रोख स्वरूपात दंड वसूल करण्यात आला आहे, तरीही त्यामुळे अशी कृत्य करणाराला वचक बसलेला नसून वाई-पाचगणी मुख्य रस्त्यावर असणार्या पसरणी घाटात रस्त्याच्या कडेलाच भाजी-पाल्याचा कचरा, पोल्ट्रीचा कचरा टाकून वाहन मालक पसार होत आहेत.
घाटात फिरायला येणार्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, ही अतिशय दुर्दैवाची बाब असून संबंधित विभागाने त्या वाहन चालकांवर कडक कारवाई करून कचरा टाकण्यापासून त्यांना प्रवृत्त करावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी व या घाटातून प्रवास करणारे वाहन चालक व प्रवासी करीत आहेत. पसरणी घाटात अनेक ठिकाणी अशा प्रकारचा कचरा टाकून जणूकाही स्वयंघोषित कचरा डेपो बनविल्याचे चित्र सध्या या ठिकाणी दिसत आहे. पाचगणी- महाबळेश्वरला जाणारे सर्वच पर्यटक पसरणी घाटातून जात असताना पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाण्याचे राहिलेले अर्धवट पार्सल, दारूच्या बाटल्या संपल्या कि, गाडीतूनच रस्त्याच्या कडेला टाकून जाण्याची प्रथाच या घाटात सुरु असल्याचे चित्र सर्हास दिसत आहे. त्यात या घाटात अनेक ठिकाणी ओल्या-सुख्या पार्ट्या करण्याचे अड्डे तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी मौज-मजा करायची आणि राहिलेले पदार्थ, दारूच्या बाटल्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकून जातात तो कचरा कमी कि- काय सध्या भाजी- पाल्याचे ढीग पसरणी घाटात रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत आहेत.
वाई शहरात या पाचगणीत घराचे दुरुस्तीचे काम करतात आणि उरलेला कचरा सरळ पसरणी घाटात आणून टाकत आहेत जैविक कचरा सुध्दा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडलेला असतो.
पाचगणी सारख्या शहरात मोठ-मोठ्या हॉटेल मध्ये बाहेरून येणारे पर्यटक जंगी पार्ट्या करून उरलेले अन्न पदार्थ, ग्लास, पत्रावळ्या, मद्य पेयाच्या बाटल्या, सुध्दा या घाटात अनेक ठिकाणी पडलेल्या असतात.त्या स्वच्छ करण्याचे काम वाई शहरातील फिरायला येणारे ग्रुप व काही सेवाभावी संघटना करीत असतात.
स्वतःचे गाव स्वच्छ करण्याच्या नादात पाचगणी नगरपालिकेने पाचगणीत येणारे पर्यटक फिरण्या बरोबर घाण कुठे टाकतायत हेही पाहणे गरजेचे आहे. पसरणी घाट स्वयंघोषित कचरा डेपो असल्यासारखा घाण करीत असतात. यावर कुठेतरी पायबंद घालण्याची गरज असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे. तरी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होत असताना याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
वन विभागाने गस्त घालून पर्यावरणावर घाला घालणार्या समाज कंटकांवर कारवाई करण्याची गरज आहे. तरच पसरणी घाट स्वच्छ राहण्यास मदत होईल. अशी मागणी जोर धरत आहे.
पसरणी घाट बनलाय ओल्या- सुक्या पार्ट्यांचा अड्डा
RELATED ARTICLES