वाई : अत्यंत कमी गरजांमध्ये आयुष्य जगणारी आणि कितीही अडचणी आल्या तरी रणांगणात पाय रोवून ठाम उभी रहाणारी, समाजातल्या रंजल्या गांजल्यांना प्रेम देणारी विलक्षण माणसं समाजात आढळतात. खून, दरोडे, बलात्कार, फसवणूक अशा मन सुन्न करणार्याश घटना वाढत असतानाही जीवन सुंदर वाटते ते या मूठभर देवमाणसांमुळेच, असे उद्गार श्रीमती संपदा वागळे यांनी काढले.
येथील महागणपती घाटावर लो. टिळक स्मारक संस्था संचलित 103 व्या वसंत व्याख्यान मालेत दहावे पुष्प गुंफताना मला भेटलेली देवमाणसे या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अॅड. शांतीलाल ओसवाल होते. श्रीमती वागळे पुढे म्हणाल्या, सत्पात्री दान या सदराच्या निमित्ताने महाराष्ट्र व बाहेरील अनेक सेवाभावी संस्थांना भेट देण्याची संधी मिळाली. आणि एक समर्पित जग माझ्यासमोर उलगडले. गावचा विकास व्हावा म्हणून उभं आयुष्य पणाला लावणारी, रंजल्या गांजल्यांना प्रेम देण्यासाठी जीवन झोकून देणारी, दुर्गम भागातील देशबांधवांसाठी जीवाचं रान करणारी, अशी अनेक देवमाणसं जवळून पाहिली आणि त्या परीस दर्शनाने माझं जग पूर्ण बदलून गेलं. अशा व्यक्तींचे कार्य कानाकोपर्यासतील संवेदनशील मनांपर्यंत पोहचवण्याचा मी वसा घेतला आहे.
यावेळी त्यांनी 40 वर्षे श्रमदान करून गावासाठी 26 किमी लांबीचा रस्ता बांधणारे गुंडेगाव (अहमदनगर) येथील भापकर गुरूजी, बेघर मनोरुग्ण स्त्रियांचा प्रेमाने सांभाळ करणारे नगर येथील डॉ. धामणे दांम्पत्य, शामच्या आईचे मातृत्व व कर्णाचे दातृत्व एकवटलेले चेन्नई येथील पालम कल्याणसुंदरम तसेच स्वतः अनाथ असूनही अनाथांचा आधारवड असलेले सागर रेड्डी या माणसांच्या विलक्षण कथा सादर केल्या.
अॅड. ओसवाल यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. शंतून अभ्यंकर यांच्या पाळी मिळी गूप चिळीफ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वेस्त वसंतराव बोपर्डीकर यांनी स्वागत केले. लक्ष्मीकांत रांजणे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. माया अभ्यंकर यांनी परिचय करून दिला. मृणालीनी खरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाईकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
जीवन सुंदर वाटते ते या मूठभर देवमाणसांमुळेच: संपदा वागळे
RELATED ARTICLES