वाईः सुभेदार जगताप यांनी कष्टातून साधेपणाने व कल्पकतेने प्रपंच केला. कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि गावाची माती व नाती जपली. तालुक्यातील अनेकांना मुंबईत आधार दिला. सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचे व्रत जोपासले. त्यांच्या नावाचे प्रतिष्ठान प्रगल्भ गावाच्या प्रगतीसाठी पूरक ठरेल, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
केंजळ (ता. वाई) येथे स्व. सुभेदार आबाजी जगताप यांचा 24 वा स्मृतिदिन व त्यानिमित्त आयोजित ग्रंथालय, व्यायामशाळा व बहुउद्देशीय सभागृह इमारतीचे भूमिपूजन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश जगताप होते.
आ. मकरंद पाटील पुढे म्हणाले, सामान्य माणूस गाव, कुटुंब, भावंडे यांच्यासाठी किती उत्तम प्रकारे योगदान देवू शकतो, याचे सुभेदार जगताप यांनी आदर्श उदाहरण घालून दिले. अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून सन्मार्गाला लावले. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून उत्तम आरोग्य कमावून उद्योगी बनावे, असा त्यांचा आग्रह असे. त्यांचा मित्र परिवार मोठा होता. त्यांचाच वारसा सुपुत्र नितीन जगताप हे पुढे नेत आहेत. अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. समाज आपल्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण समाजासाठी काय करतो, ही जाणीव ठेऊन नितीन काम करतात. प्रतिष्ठानच्या माध्यमातून मन, बुध्दी प्रगल्भ करणारे ग्रंथालय व शरीर सुदृढ करणारी व्यायामशाळा ही नव्या पिढीची प्राधान्याची गरज होती.
यावेळी विलास गायकवाड, चारुदत्त चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. नितीन जगताप यांनी प्रास्ताविकात नवी पिढी व ग्रामस्थ यांना शारिरीक व मानसिकदृष्टया सक्षम करण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील राहील, असे सांगितले. बहुउद्देशीय सभागृहात सामान्य गावकर्यांीची नाममात्र दरात निवासाची सोय होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी इमारतीसाठी जागा देणगीदार अजित जगताप यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पा मालुसरे, संदीप जावळे, संदीप जगताप, विलास जगताप, अनिकेत गायकवाड, अभिजीत लोखंडे, गणेश पवार, कौशिक देशमुख, विजय कदम, सुभाष भिसे, युवराज जमदाडे, अभिजित पवार, पवन धापते, अभिजित कांबळे, बाजीराव येवले, सुरेश कदम, ग्रामपंचायत सदस्या लता जगताप, हर्षल कदम, उस्मान बागवान आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
संदीप प्रभाळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
जगताप नावाचे प्रतिष्ठान प्रगल्भ गावाच्या प्रगतीसाठी पूरक ठरेल: आ.मकरंद पाटील
RELATED ARTICLES