पुणे : देशात भटकंती करीत असताना स्वतःच्या क्षुद्रतेचा आणि निसर्गाच्या महानेतेचा अंदाज आला. भटकांतीतून अनेक अनुभव आले. निसर्गात प्रत्येकाने भटकंती करायला हवी. पर्यटकांना निसर्ग आणि पर्यावरण साक्षर केले पाहिजे तसेच निसर्गाचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. संदीप गजानन श्रोत्री यांनी व्यक्त केली.
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कै. अनंत सुर्वे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार डॉ. संदीप गजानन श्रोत्री लिखित कासवाचे बेट या पुस्तकास देण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देतांना डॉ. श्रोत्री बोलत होते. तर कै. विश्वनाथ नरवणे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा चेतना पुरस्कार आशुतोष श्रीकृष्ण बापट लिखित भटकंती आडवाटेची या पुस्तकास देण्यात आला. 5 हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कारांचे वितरण मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. ग्रंथालयाच्या केशव सभागृहात मंगळवारी सायंकाळी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर कार्यवाह डॉ. अनुजा कुलकर्णी, सहकार्यवाह विद्युत पावगी, उपकार्याध्यक्ष श्रीकांत देव, उपाध्यक्ष डॉ. सुरेश पळसोदकर होते.
अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ. देगलूरकर म्हणाले, श्रोत्री आणि बापट यांनी वेगळी वाट शोधल्यामुळे ते पुस्तकातून कळले. प्रत्येकाने संधी शोधल्या तर जीवनाला अर्थ मिळतो.
सत्काराला उत्तर देतांना बापट म्हणाले, मी आडवाटेने जाणार माणूस. भटकंती करीत असताना ते पुस्तकरुपात येईल असे वाटले नव्हते. भटकंती साहित्य प्रकारात मोडले जाते की नाही याबाबत मतभिन्नता असताना पुस्तकाला पारितोषिक देऊन सन्मान केला गेला आहे. एव्हरेस्टवीर उमेश झिरपे, प्रसाद जोशी तसेच नंदा सुर्वे, प्र. के. घाणेकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक डॉ. सुरेश पळसोदकर यांनी तर मान्यवरांचा परिचय कार्यवाह डॉ. अनुजा कुलकर्णी, सहकार्यवाह सुधीर इनामदार, कार्यकारी मंडळ सदस्य दिनेश पुणताबेकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्युत पावगी यांनी केले.
निसर्गाचे प्रतिबिंब साहित्यात उमटावे-डॉ. संदीप श्रोत्री
RELATED ARTICLES