पाटण : कोयना अभयारण्या अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये समाविष्ट असलेल्या पाटण तालुक्यातील कोयना विभागातील मळे, कोळणे, पाथरपुंज या गावांच्या पर्यायी पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडला असून ही गावे स्थलांतर करण्याची आहेत या कारणांमुळे या गावांना विकासापासुन वंचित ठेवल्यामुळे या तिन्ही गावातील लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तत्काळ पर्यायी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लाऊन न्याय द्यावा अन्यथा आम्ही तीन गावांतील ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला असल्याचा इशारा मळे, कोळणे, पाथरपुंज या गावातील ग्रामस्थांनी शासनास निवेदनाद्वारे दिला असून या निवेदनाच्या प्रती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सातारा, उपजिल्हाधिकारी सातारा,खासदार उदयनराजे भोसले, आमदार शंभुराजे देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्रांताधिकारी पाटण, तहसिलदार पाटण,यांना देण्यात आल्या आहेत,
सदर निवेदनात म्हटले आहे की, मळे कोळणे पाथरपुंज ही तीन अतिदुर्गम गावे आजपर्यंत अभयारण्यात वास्तव्य करीत आहेत, सदर अभयारण्याला सन 1986 साली चांदोली अभयारण्य म्हणून शासनाने घोषित केले. व यास 1990-92 च्या दरम्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले, यानंतर सद्या 2004 पासून हे उद्यान सह्याद्री व्याघ्रप्रकल्प (कोअरझोन) म्हणून घोषित झाले असल्याने या तीन गावांचे स्थलांतर करून पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे शासनाने त्यावेळी जाहीर केले होते. मात्र ही तीन गावे स्थलांतर करण्याची आहे म्हणून या गावातील जनतेला 18 नागरी सुविधा पासून आज पर्यंत वंचित ठेवण्यात आले आहे.
परिणामी शासनाकडून मिळणार्या विकासकामे व सुविधा बंद झाल्याने गावच्या ग्रामस्थांनी मिळून मळे, कोळणे, पाथरपुंज ते नाव असा 9 किलोमीटरचा रस्ता श्रमदानातून केला, व त्या केलेल्या रस्त्यामुळे या तीन गावातील अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात आम्हा ग्रामस्थांना यश आले.
आम्ही अनेक वर्षापासून कसत असलेली शेती 2004 पासून कसु देऊ नये असे महाराष्ट्र शासनाने वनविभागास कळविले आहे. त्यामुळे आमच्या तीन गावांचा उदरनिर्वाह बंद झाल्याने ग्रामस्थांच्या जीवन-मरणाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे, यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलनाचा इशारा करूनही शासनाने आम्हाला आज अखेरपर्यंत न्याय दिला नाही,
यामुळे आम्ही तिन्ही गावातील ग्रामस्थ निवेदनाद्वारे शासनास कळवू इच्छितो की ह्या मळे, कोळणे, पाथरपुंज या गावांचे पुनर्वसन किती महिन्यात करणार? व जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्हाला तीन गावांना जोडला जाणारा मळे, कोळणे,पाथरपुंज ते नाव असा 9 किलोमीटरचा रस्ता खडीकरण करून देण्यात यावा. व 2004 सालापासून कसण्यासाठी बंद केलेल्या शेतीचे वार्षिक मानधन आम्हा ग्रामस्थांना मिळावे. याची शासनाने गंभीर दखल घेऊन आम्हा ग्रामस्थांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही तीन गावे येत्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा शेवटी निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर भरत चाळके, भास्कर चाळके, चंद्रकांत चाळके, अंकुश पवार, संपत पवार, संजय कांबळे, पांडुरंग डांगरे, लक्ष्मण जाधव, प्रकाश जाधव यांच्या सह मळे, कोळणे, पाथरपुंज या गावातील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
कोयना अभयारण्य-सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या जाचातून बाहेर येण्यासाठी मळे, कोळणे, पाथरपुंज गावांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार
RELATED ARTICLES