Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीवाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची पश्चिम भागतील शेतकर्‍यांची मागणी

वाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची पश्चिम भागतील शेतकर्‍यांची मागणी

वाई : गेल्या पंधरा दिवसात पावसाचे वेगळेच रूप पहायला पश्चिम भागातील लोकांना मिळाले, पावसाचा जोर इतका प्रचंड आहे कि, गेल्या काही दिवसांत घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे, परिसरातील ओढ्यातून वाहणारे रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर पाच फुट पाणी आहे, घरांसह डोगर कोसळण्याची भीती उरात बाळगून या परिसरातील शेतकरी वावरताना दिसत आहे, वाई तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतीच्या नुकसानीची, घरांच्या पडझडींची, वाहून गेलेल्या म्होर्‍यांची, भात शेतीची पाहणी करून पंचनामे त्वरित करून वाई तालुक्याच्या पश्चिम भागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पश्चिम भागातील शेतकरी करीत असून त्या अनुषंगाने सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकार्यांची बैठकीचे आयोजन वाईत करण्यात यावे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत व त्यांना शासकीय मदत त्वरित मिळावी यासाठी महसूल विभागाने शासन दरबारी प्रयत्न करावा. यावर्षीचा खरीप हंगाम वाया गेल्याने शासनाने शेतकर्‍यांना भरीव मदत करावीअशी मागणी जोर धरत आहे.तालुक्यात 18 ठिकाणी ब्रिटीश कालीन पूल आहेत.वाईच्या कृष्णा पुलाचा प्रश्न महत्वाचा असल्याने त्या संदर्भात बांधकाम विभाग व पालिका प्रशासनाने गांभीर्याने याकडे पहावे अन्यथा वाई शहराला जोडणार्‍या नवीन पुलाची उभारणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा अशी मागणी वाईकर नागरिक करीत आहेत. कृषी विभागाने वाईच्या पश्चिम भागात जांभळी खोर्‍यात भात शेतातील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. कित्येक शेतातील बांध फुटून संपूर्ण भात शेत पाण्याखाली आले आहे, तर पश्चिम भागातील डोंगरावर असणार्‍या त्रीस्टार हॉटेल्स व काही बंगल्यांमुळे अनेक ठिकाणी माळीन गावांसारखी परिस्थिती निर्माण होवू शकते, तरी मह्सून विभागाने त्या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करून होणारा मोठा अनर्थ टाळून या भागातील नागरिकांवर आलेले संकटाचे ढग दूर करावेत.महावितरणाचे उपभियांता अविनाश खुपसे यांनी तालुक्यात पन्नास ठिकाणी लाईटचे खांब ढासळले आहेत तर त्यातील पस्तीस पोल दुरुस्त करण्यात आले आहेत. तेही लवकरच दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले, तसेच प्रचंड पाऊस पडत असूनही महावितरणच्या कर्मचार्‍यांनी भर पावसात 24 तास सेवा दिली आहे. जवळपास पाण्याचा धोका लक्षात घेवून बावीस मुख्य डीपी बंद करण्यात आले होते.
ते आज मितीला पूर्ववत चालू करण्यात आले आहेत. बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते नादुरुस्त झाल्याचे सांगत पुलाचे डांबर वाहून गेले, प्रचंड पावसामुळे अनेक ओढे-नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी रस्त्याच्या साईड पट्ट्या वाहून गेल्या आहेत, मुख्य रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तीनतेरा वाजले असून पावसाचे पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत घुसल्याने नळांना गढूळ पाणी येत आहे, ग्रामपंचायतीने पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे, नादितून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे त्या बरोबर कालव्यातून पाणी सोडल्यास दुष्काळी भागाकडे कालव्यातून पाणी जावून वाया जाणार्‍या पाण्याचा योग्य वापर होईल. सध्या कृष्णा नदीच्या पात्रात14 हजार क्युसेस पाणी चालू असल्याचेपाटबंधारे खात्याने सांगितले आहे. नदी काठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले असून त्यांच्या खाण्याची व्यवस्था महसूल विभाग सांभाळत आहे.
एकंदरीत वाई तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरु असून प्रत्येक विभाग सतर्क आहेच परंतु गरीब सर्वसामान्य लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यासह वाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular